केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानातून राज्यातील २४ जिल्ह्यांत ४० हजार ९३३ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे.
केंद्राच्या ‘मनरेगा’मधून ३४ जिल्ह्यांत अंमलबजावणी
पुणे : केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानातून राज्यातील २४ जिल्ह्यांत ४० हजार ९३३ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच इतक्या मोठय़ा प्रमाणावर लागवड करण्यात यश आले आहे.
केंद्र सरकारने फळबाग लागवडीच्या माध्यमातून शाश्वत रोजगारनिर्मिती व्हावी, शेतीपूरक व्यवसायात वाढ व्हावी. या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात आली होती. राज्याला २०२१-२२ या काळात ६० हजार हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४० हजार हेक्टरवर लागवड करण्यात कृषी विभागाच्या यंत्रणांना यश आले आहे. योजनेसाठी राज्यभरातून १ लाख ६ हजार ७४७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. पात्र लाभार्थ्यांच्या ४० हजार ९३३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. त्यात आंबा १९,४०२ हेक्टर, संत्रा ४,५९५ हेक्टर, काजू ३७११ हेक्टर, मोसंबी २३६४ हेक्टर, नारळ १४५८ हेक्टर क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही योजना शंभर टक्के केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आली असून, त्यासाठी ११ कोटी ९०५ लाख ६३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
लागवडी खालील फळं
आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, साग, गिरीपुष्प, सोननचाफा, कडुलिंब, सिंधू, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, करंज आदी तीस जातींची फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड शेतात, बांधांवर, पडीक जमिनीवर करण्यात आली आहे.
यंदा ५५ हजार हेक्टरचे उद्दिष्ट
राज्यात फळबाग लागवडीला चांगला वाव आहे. सिंचनाच्या सोयींमध्ये वाढ होताच माळरानांवरही आता फळबाग लागवडी होऊ लागल्या आहेत. त्याला केंद्र सरकारच्या योजनेमुळे गती आली आहे. २०२२-२३ या वर्षांकरिता ५५ हजार हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी १ कोटी १३ लाख ३५,००० हजार रोपांची आवश्यकता आहे.
राज्य फलोत्पादनात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांना फळपिकांतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. पारंपरिक फळपिकांच्या पट्टय़ात अन्य फळपिकांची लागवड होत आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
– डॉ. कैलास मोते, संचालक फलोत्पादन