‘देशातील आधीच्या सरकारांनी मेडिकल शिक्षणाच्या सुविधांकडे नीट लक्ष दिले असते तर आज भारतातील विद्यार्थ्यांना ते शिक्षण घेण्यासाठी परदेशांत जाण्याची वेळ आली नसती’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी याआधीच्या सरकारांवर त्याचा ठपका ठेवला.
‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला. ‘आधीच्या सरकारांनी मेडिकल शिक्षणाच्या सुविधांकडे नीट लक्ष दिले नाही. तेव्हा त्यांनी लक्ष दिले असते तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. आता त्यांच्या चुका दुरुस्त करण्याचे काम आम्ही करीत आहोत. कुठल्याही पालकांना आपली मुले शिक्षणासाठी परदेशी जावीत असे वाटत नसते’ असे मोदी यावेळी म्हणाले. ‘आधी देशात ३०० ते ४०० मेडिकल कॉलेजे होती; तो आकडा आता ७००च्या घरात पोहोचला आहे. आधी आपल्या देशात मेडिकलच्या ८० ते ९० हजार जागा होत्या; तो आकडा आता सुमारे दीड लाख इतका झाला आहे’, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. ‘देशात प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे यासाठी मी प्रयत्नशील आहे’, अशी पुस्ती मोदी यांनी जोडली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून प्रचंड संताप व उद्वेग व्यक्त झाला व अद्यापही व्यक्त होत आहे. त्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, ‘अतिशय बिकट अशा परिस्थितीत त्यांना संताप येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. अतिशय लहान वयात त्यांना खूप काही सोसावे लागले.’ त्याचबरोबर, ‘ऑपरेशन गंगासाठी विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत’, असेही मोदी यांनी नमूद केले.