डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (बार्टी) २०२० साली दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी दोन लाख रुपये देणारी डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे उलटली तरी ती कार्यान्वित झालेली नाही. बार्टीची योजना कुठे गेली, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा इंजिनीअरिंगच्या प्रवेशपरीक्षेसाठी कोचिंग क्लासेसमधून तयारी करवून घेण्यासाठी २ लाख रुपये देण्यात यावे, अशी ही योजना आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सात प्रशासकीय विभागांतून ८,६२१ अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले. त्यापैकी ४,०१० विद्यार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज केला. त्यामधून साडेतीन हजार अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने निधीचा तुटवडा निर्माण झाला आणि योजना अधांतरीच अडकली.
आता निवडणार टॉप तीन
मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असल्याने बार्टीसमोर निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नव्याने योजना आखण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नवीन आराखड्यानुसार, या योजनेसाठी आलेल्या अर्जांपैकी प्रत्येक जिल्ह्यातून टॉप तीन विद्यार्थी निवडण्यात येतील. त्यानुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १०८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचाच अर्थ एकूण अर्जांपैकी केवळ चार टक्केच विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. तसेच या योजनेच्या भरवशावर खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतलेल्या इतर विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
महिनाभरात मिळेल!
योजनेसाठी बार्टीकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे. परंतु, सरकारने नव्याने प्रस्ताव सादर करायला लावल्यामुळे योजना लागू करण्यात विलंब झाला. सर्वप्रथम मागील वर्षातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. येत्या महिनाभरात विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सध्यातरी योजना उपलब्ध होणार नाही, अशी माहिती बार्टीचे संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.