आंदोलनाची दखल घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ई-पास निर्णय मागे घेतला आहे.
करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा या मंदिरातील ई-पासची सक्ती मागे घेण्यात आल्याने रविवारी भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली होती. दीर्घकाळानंतर दोन्ही मंदिरासमोर भाविकांची मोठी रांग लागली होती.
करोना संसर्गाच्या नियमामुळे राज्यातील देवस्थानवरही निर्बंध आले होते. नवरात्रीत मंदिर दर्शन खुले करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. दर्शन व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी भाविकांना ई-पास नोंदणी बंधनकारक केली होती. मात्र या विरोधात वाडी रत्नागिरी येथे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून जोतिबा मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केले होते. कोल्हापुरातही महालक्ष्मी भाविकांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ई-पासची सक्ती मागे घेतली आहे.
साखर पेढे वाटून आनंद
आंदोलनाची दखल घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ई-पास निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचा प्रत्यय आज दिसून आला. महालक्ष्मी व ज्योतिबा या दोन्ही मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी रविवारी गर्दी केली होती. ई-पास विना रांगेतून दर्शन मिळत असल्याने महालक्ष्मी मंदिराचा परिसर भाविकांनी फुलला होता. जोतिबाचे खेटे रविवारी सुरू असल्याने तेथे गर्दी असते. तर आज ई-पास बंधनकारक नसल्याने गुलालात माखलेल्या भाविकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. दरम्यान प्रशासनाने हा निर्णय घेतल्याबद्दल भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी आज साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.