मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील एकाही मंत्र्याने गेल्या सव्वा दोन वर्षांत मंत्रिमंडळांच्या बैठकांना १०० टक्के हजेरी लावलेली नसून दांडीबहाद्दरह्ण मंत्र्यांमध्ये शंकरराव गडाख, डॉ. राजेंद्र शिंगणे, उदय सामंत आघाडीवर आहेत.
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. तेव्हापासून २३ डिसेंबर २०२१ पर्यंत मंत्रिमंडळाच्या ९४ बैठका झाल्या असून त्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेच सर्वाधिक बैठकांना उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असली तरी आजारपणामुळे ठाकरे यांना दोन बैठकांना उपस्थित राहता आले नसल्याचे मुख्य सचिव कार्यालयाने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्वाधिक २६ वेळा मंत्रिमंडळ बैठकीस दांडी मारली असून त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे २१ वेळा, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी २० वेळा, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे १९ वेळा, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी वन मंत्री संजय राठोड १६ वेळा, ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत, भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या दोघांनी १५ वेळा मंत्रिमंडळ बैठकीस दांडी मारली आहे. काही वेळा मंत्र्यांनी प्रत्यक्ष सहभाग न घेता दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला असून काहीजन मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने गैरहजर राहिल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
The post मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर appeared first on Loksatta.