अहमदाबाद : डावखुरा फिरकीपटू शाम्स मुलानीने (५/६०) दुसऱ्या डावातही केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा ११९ धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या डावात १६४ धावांनी पिछाडीवर पडूनही विजय साकारणाऱ्या मुंबईने ड-गटात अग्रस्थान पटकावले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने दिलेल्या २३२ धावांचा पाठलाग करताना गोव्याचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांत आटोपला. फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या मुलानीने पहिल्या डावातही सहा बळी पटकावले होते. त्याला तनुष कोटियनने (३/२९) उत्तम साथ दिली. मुंबईच्या खात्यात दोन सामन्यांत नऊ गुण असून ३ मार्चपासून रंगणाऱ्या लढतीत मुंबईची ओदिशाशी गाठ पडेल.
तत्पूर्वी, ७ बाद ३२२ धावांवरून पुढे खेळताना मुलानी (५०) आणि कोटियन (९८) यांनी आठव्या गडय़ासाठी रचलेल्या ११६ धावांच्या भागीदारीमुळे मुंबईने ८ बाद ३९५ धावांवर दुसरा डाव घोषित केला.
संक्षिप्त धावफलक
’ मुंबई (पहिला डाव) : १६३
’ गोवा (पहिला डाव) : ३२७
’ मुंबई (दुसरा डाव) : ९ बाद ३९५ घोषित
’ गोवा (दुसरा डाव) : ४८ षटकांत सर्व बाद ११२ (अमूल्य पांढरेकर २३; शाम्स मुलानी ५/६०, तनुष कोटियन ३/२९)
’ सामनावीर : शाम्स मुलानी
’ गुण : मुंबई ६, गोवा ०
The post रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुलानीमुळे मुंबईचा विजय ; पहिल्या डावातील पिछाडीनंतरही गोव्यावर ११९ धावांनी मात appeared first on Loksatta.