सीसीटीव्हीचे धोरण
येते शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) बसविण्याचे आणि ते सुरु असतील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. एकूण ६५ हजार शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपैकी आतापर्यंत १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सखी-सावित्री समित्यांची स्थापना
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींकरीता निकोप आणि समतातूल्य वातावरण निर्माण करण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी-सावित्री समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
तक्रारीचा पाठपुरावा
शाळा स्तरावरील सखी-सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला, शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी), पोलीस पाटील, महिला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला पालक प्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. शाळांमध्ये काही आक्षेपार्ह प्रकार आढळल्यास या समितीच्या माध्यमातून त्याची तक्रार शाळा व्यवस्थापनाकडे करण्यात येईल. तक्रारींचे निवारण होईपर्यंत समितीतर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
दर्शनी भागावर मोबाइल नंबर
यासोबतच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत का? सखी-सावित्री समित्यांची स्थापना करण्यात आली आहे का? हे पाहण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्तांची असणार आहे. यासोबत शाळेतील एका महिला शिक्षिकेवर मुलींना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असणार आहे. पोलीस काका, पोलीस दीदी ही संकल्पना राबविण्यात येत असून यांचे नंबर शाळेच्या दर्शनी भागावर ठळकपणे दर्शविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.