पुण्यभूषण फाउंडेशनच्यावतीने सर्वोत्तम दिवाळी अंकाच्या पुरस्काराचे वितरण समारंभात केलं विधान
पुण्यातील पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा सर्वोत्तम दिवाळी अंकाच्या पुरस्काराचे वितरण आज (शनिवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषेबद्दल प्रत्येकाने अभिमान बाळगावा असं म्हटलं, तसेच, तुम्ही कोणत्या भाषेत शिकताय याला महत्व नाही, तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला अभिमान, प्रेम असणं गरजेचं असंही सांगितलं.
आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, ”मला असं वाटतं आपल्या भाषेबद्दल आपण आग्रही असणं गरजेचं आहे. विनाकारण आणप सोंगट्यांसारखं, गोट्यांसारख घरंगळत जाण्यात काही अर्थ नाही. आपल्या भाषेवर आपण ठाम रहाणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या भाषेत शिकताय याला महत्व नाही, तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला अभिमान, प्रेम असणं गरजेचं आहे आणि हे वाचून येईल. साहित्यिकांनी आणि कवींकडून माझी हीच अपेक्ष आहे की त्यांनी या समाजावर संस्कार करावेत, त्यांनी ही भाषा टिकवावी, त्यांनी येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना देखील मराठी बद्दल एक ओढ लावावी. तिच्यावर प्रेम करायला शिकवावं. हे तुमच्या हाती आहे आणि ते तुम्ही वृद्धिंगत करावं हीच मी अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्रात जेवढे संत, कवी, साहित्यिक झाले त्यांच्या प्रत्येकाच जन्म दिवस हा मला असं वाटतं मराठी भाषा दिवस असला पाहिजे.”
तसेच, ”अर्ध्या झाकलेल्या आणि पूर्ण उघड्या असलेल्या अशा समोर बसलेल्या माझ्या मराठी साहित्यप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो. काहींचे मास्क आहेत काहींचे नाही, मी कधी वापरलाच नाही. आम्हाला मुलायम मराठी बोलता येत नाही, पण मराठीसाठी जे जे करता येईल ते आम्ही करत असतो. खरंतर आता या कोविडच्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर माणसं एकत्र येताना, भेटताना बघूनच बरं वाटतं. हा शिवरायांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा महाराष्ट्र ही आमच्या महाराष्ट्राची ओळख. परंतु खुर्च्यांवरील फुल्यांचा महाराष्ट्र ही कधी आमच्या महाराष्ट्राची ओळख नव्हती. खरंतर आता या फुल्या गेल्या पाहिजेत. माणसं एकत्र आली पाहिजेत, भेटली पाहिजेत. एकमेकांशी बोलली पाहिजे, मनातून भीती काढली पाहिजे. काय काय पाहिलं आपण? घरातल्या घरात स्पर्श करायला तयार नव्हते कुणी. परंतु आता सगळे वाईट दिवस जाऊन आपण पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करतोय.” असं राज ठाकरे भाषणाच्या सुरुवातीस म्हणाले.
याचबरोबर, ”आम्ही मराठीसाठी, मराठी भाषेसाठी काम करणारी माणसं. तुमची साहित्य वेगळी आमची साहित्य वेगळी, तुमची साहित्य वाचावीशी वाटतात आमची परवडत नाहीत. त्यामुळे या दोन वेगळ्या साहित्यांना एकत्र व्यासपीठावर कसं आणलं मला माहिती नाही परंतु मी हो बोलून गेलो आणि हो एवढ्यासाठीच बोललो मी, त्याचं एकमेवक कारण म्हणजे ही पारितोषिकं ही दिवाळी अंकात आहेत आणि माझ्या पहिल्या व्यंगचित्रांची सुरूवात जी झाली ती दिवाळी अंकातून झाली. आमच्या मार्मिकच्या दिवाळी अंकात मी व्यंगचित्र सुरू केलं, त्यावेळी मी शाळेत होतो.” अशी आठवण देखील राज ठाकरे यांनी सांगितली.
याचबरोबर, ”खंरत विधानसभवनात सेनापती बापट कोण असं विचारलं गेलं. पण विधानभवनात आपण अपेक्षा धरू शकतो ही. कारण बालभारतीच्या वरती काही वाचलेलं नसताना देखील जाता येतं. तिथे सेनापती बापट समजून सांगायचं म्हणजे फारच झालं. त्यामुळे आपण अपेक्षा धरू शकतो. यामध्ये काही फारसं वेगळं झालंय असं काही मला वाटत नाही, तेव्हाही नव्हतं आताही वाटत नाही.” असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला देखील लगावला.