शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे
राज्यात भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये जलीली यांनी युतीची ऑफर दिली आहे. जलील यांच्या प्रस्तावानंतर राज्यात राजकारणाची नवी समीकरणे जुळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना भवनावर पार पडलेल्या शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानामध्येही शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबत भाष्य केले आहे. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत भाष्य केले.
“मी आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो, मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो”; AIMIMच्या ऑफरवरुन फडणवीसांवर शिवसेनेची टीका
“शिवसेनेला तत्व किंवा धोरण नाही. दिशाहिन पक्ष म्हणजे शिवसेना,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टिव्ही ९सोबत बोलताना दिली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी नारायण राणे जामनेर येथे आले होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे,” असं उद्धव ठाकरेंनी बैठकीत म्हटले आहे.
दरम्यान,औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या एमआयएमबरोबर उघड वा छुपी आघाडी होऊच शकत नाही. ज्यांच्याबरोबर छुपी हातमिळवणी आहे त्यांना लखलाभ ठरो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. एमआयएम हा समविचारी पक्ष आहे हे या पक्षाने आधी सिद्ध करावे. उलट हा पक्ष कोणाचा ब संघ आहे हे लोकांना चांगलेच कळले असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले होते.