- 1 रशियानं हल्ला केल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून परतलेल्या पूर्वानं तिथला थरारक अनुभव सांगितला आहे.
- 2 बंकरमध्ये आश्रय, सायरनचे आवाज, मिसाईलचे स्फोट
- 3 दोन दिवस एक रात्र रांगेत उभं राहिल्यानंतर नंबर लागला!
- 4 रायगड जिल्ह्यातील ३ विद्यार्थी युक्रेनमधून परतले
रशियानं हल्ला केल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून परतलेल्या पूर्वानं तिथला थरारक अनुभव सांगितला आहे.
हर्षद कशाळकर
“युक्रेनमधील युद्ध परिस्थिती भयावह आहे. घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे. या परिस्थितीत घरी सुखरूप परत येईन याची शाश्वतीच राहिली नव्हती. पाच दिवसांच्या खडतर प्रवासानंतर आज सुरक्षित घरी पोहोचले याहून समाधानाची बाब नाही”, अशा शब्दांत अलिबागच्या धेरंड येथील पूर्वा पाटील हिने युक्रेनहून परतल्यावर आपला अनुभव माध्यमांसमोर सांगितला. तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करण्याचे आवाहन तिने यावेळी सरकारकडे केले.
बंकरमध्ये आश्रय, सायरनचे आवाज, मिसाईलचे स्फोट
पूर्वा ही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेली होती. युक्रेनमधील विन्नित्सा शहरात वास्तव्यास होती. रशियाने केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या युध्द परिस्थितीमध्ये ती युक्रेनमध्ये अडकून पडली होती. बॉम्ब आणि मिसाईलचे हल्ले सुरु झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले. त्यानंतर दोन दिवस पूर्वा व तिच्या सहकाऱ्यांनी बंकरमध्ये वास्तव्य केले. “अतिशय भयावह परिस्थिती होती. सतत लष्करी विमानांचे ताफे शहरावर घोंगावत होते. अधून मधून बॉम्ब आणि मिसाईले पडत होते. कानठळ्या बसवणारे सायरनचे आवाज धडकी भरवत होते. अशा परिस्थितीत आपण या परीस्थितीतून सुखरूप बाहेर पडू याची शाश्वतीच राहिली नव्हती”, असं तिने सांगितलं.
दोन दिवस एक रात्र रांगेत उभं राहिल्यानंतर नंबर लागला!
दोन दिवसांनी आम्ही युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. एका बसची व्यवस्था केली. बॉर्डरच्या आठ किलोमीटर अलिकडे या बसनी आम्हाला आणून सोडले. यानंतर आठ किलोमीटर चालत आम्ही सीमारेषेवर पोहोचलो. या ठिकाणी खूप मोठी रांग लागली होती. हजारो विद्यार्थी या ठिकाणी उभे होते. दोन दिवस एक रात्र या रांगेत मी उभी होते. दोन दिवसांनी रुमानिया देशात मला प्रवेश मिळाला. तिथे भारतीय दूतावासाने व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांसाठी राहाण्याची, अन्न पाण्याची व्यवस्था तिथे करण्यात आली होती. तिथून विमानतळापर्यंत जाण्याची सोयही भारतीय दूतावासाने उपलब्ध करून दिली आहे. सहा तासांचा प्रवास करून काल रात्री मी तेथील विमानतळावर पोहोचले. तिथून विमानाने आज सकाळी मुंबईत दाखल झाले आणि तिथून अलिबागला घरी परतले.
“…आणि मग अंधारावर प्रकाशाचा विजय होईल”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं भाषण संपल्यावर युरोपच्या संसदेत मिनिटभर टाळ्या थांबल्याच नाहीत!
हा प्रवास सोपा नव्हता. असं काही घडेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. घरी सुखरूप परतल्याचा नक्कीच आनंद झाला आहे. पण युक्रेनमधील नागरिक सुरक्षित नाहीत. युद्ध परीस्थितीमुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सीमारेषेपर्यंत येणे कठीण झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सीमारेषेपर्यंत आणण्याची व्यवस्था व्हायला हवी. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत”, असे मत पूर्वाने यावेळी व्यक्त केले. युक्रेनमधून बाहेर पडणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारने चांगली व्यवस्था ठेवली असल्याचे देखील तिने यावेळी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील ३ विद्यार्थी युक्रेनमधून परतले
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होते. यापैकी तीन विद्यार्थी आत्तापर्यंत परतले आहेत. तर २९ विद्यार्थी अजूनही युक्रेन मधील विवीध शहरात अडकून पडले आहेत. या सर्वांना तातडीने भारतात आणावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जात आहे.