नगर : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने नगरकरही शोकाकुल झाले. शहरात अनेक भागात फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोनानगर भागातील महिला भजनी मंडळाने त्यांच्या अंतयात्रेसमयी भजने व त्यांची भक्तिगीते गाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
चित्रावरील सही राहिली..
जादूई आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध केले. लताजी म्हणजे गान सरस्वतीच. एक कलाकार म्हणून लताजींचे चित्र साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. हे शिवधनुष्य पेलत मी लताजी व त्यांच्या जोडीला सरस्वती असे चित्र साकारले. त्यांची सही असलेले कृष्णधवल छायाचित्र माझ्या संग्रही होते. परंतु स्टुडिओला लागलेल्या आगीत ते नष्ट झाले. पुन्हा त्यांची सही घेण्यासाठी सरस्वती व लताजी यांचे चित्र साकारले, परंतु अनेकदा प्रयत्न करूनही करोना संकटामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. सरस्वतीचा आशीर्वाद व कृपादृष्टी असेल, तरच लताजींसारखा महान कलाकार घडू शकतो, अशा भावना मी या चित्रातून व्यक्त केल्या.
– प्रमोद कांबळे, चित्रशिल्पकार.
‘भूपाळी ते भैरवी गाणारे स्वररत्न देशाने गमावले’
गाण्यातून जगणे शिकविणाऱ्या, त्याचा आनंद देणाऱ्या लतादीदींचे निधन वेदनादायी आहे. भूपाळी ते भैरवी अशा व्यापक गानप्रवासामुळे त्या रसिकांसह सर्वसामान्य माणसाला आपल्या वाटत राहिल्या. देशाने आज एक स्वररत्न गमावले. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेला सांगीतिक वारसा दीदींनी जोपासला आणि आपल्या भावंडांसह समृद्ध केला. शेवटच्या श्वासापर्यंत केलेली स्वरसाधना वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल.
– राधाकृष्ण विखे , आमदार
मौनातील गुरुदेवांशी साधला संवाद
लतादीदी नगर शहरातील दत्त देवस्थानमध्ये व गुरुदेव क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी १९९५, १९९६ व १९९७ अशा सलग तीन वर्ष राम शेवाळकर, व. दी. कुलकर्णी यांच्या समवेत आल्या होत्या. त्यानंतर १९९८ मध्ये गुरुदेव मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या भेटीसाठीही गेल्या होत्या. तेथे त्यांच्या संतचरित्रावर चर्चा रंगल्या होत्या. एकदा महाराज मौनामध्ये असताना लतादीदींनी त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. गुरुदेव मौनामध्ये असतानाही लतादीदी त्यांच्याशी संवाद साधू शकल्या.
– मंदा जोशी, गुरुदेवांच्या शिष्य, नगर.
भारताचे वैभव हरपले
लतादीदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले. अशी गायिका पुन्हा होणे नाही. गाणारे अनेक आहेत पण लतादीदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मीळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायिलेली भक्तिगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळय़ा क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादीदींचे गाणे ऐकले की, क्षणात श्रमपरिहार होत असे. लतादीदींच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
– कि. बा. तथा अण्णा हजारे
स्वर कानात गुंजत राहतील. देहरूपाने लतादीदी आपल्यातून निघून गेल्या तरी शुद्ध स्वरूपातील त्यांचे स्वर जगाच्या कानात गुंजत राहतील, त्या मुलायम स्वरांची मनाला पडलेली भुरळ कायम राहील. केवळ सूरच नव्हे तर त्यांचे संगीतही अनमोल ठेवा आहे. मी जरी शास्त्रीय संगीताचा चाहता असलो त्यांचे सूर मनाला भुरळ पाडणारा आहे, त्यातील बारकावे नवीन पिढीने आत्मसात करावेत. असा अलौकिक सूर भारतात, महाराष्ट्रात निर्माण झाला, याबद्दल कृतज्ञता आणि अभिमान वाटतो.
-प्रा. डॉ. देविप्रसाद खरवंडीकर,
ज्येष्ठ संस्कृत व संगीत अभ्यासक.
‘गाण्याचा आत्मा हिरावला’ एकशेतीस कोटी भारतीयांच्या मनातील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने गाण्याचा आत्मा परमेश्वराने हिरावला, अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने आपण सर्वच जण भारतरत्नाला पारखे झालो आहोत, त्यांचा आवाज भारतीय सिनेमात अजरामर राहील.
– स्नेहलता कोल्हे, माजी आमदार.
The post लतादीदींच्या निधनाने नगरकर भावूक appeared first on Loksatta.