Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा उल्लेख करत हा निकाल म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचं म्हटलं आहे.
निर्णय दिल्लीत झाला आता फक्त…
“मॅच फिक्सिंग कसं असावं हे ठरवण्यासाठी भेटले. हे सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर असणार. नरेंद्र मोदी 12 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला. 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे. सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहितीये? हे घटनाबाह्य सरकार टीकवलं जाणार हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला निकाल माहिती आहे का? याचा अर्थ प्रधानामंत्र्यांनी निर्णय माहिती आहे. निर्णय दिल्लीत झाला आहे. त्यावर फक्त आता शिक्का मारणार आहेत, हे सुद्धा आम्ही रेकॉर्डवर घेत आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.
मॅच फिक्सिंग कोणत्या स्तराला
“मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावर चालले आहेत. घटनेनुसार निर्णय देणार आहेत. तर घटनेनुसार निर्णय होणार असेल तर तुम्ही कोणत्या आत्मविश्वासाने दाओसला चालला आहात शिष्टमंडळ घेऊन? तु्म्ही घटनेनुसार मुख्यमंत्री राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. याचाच अर्थ असा आहे मॅच फिक्सिंग झाली आहे. मुख्यमंत्री, भाजपा आणि विधानसभेचे सो कॉल्ड ट्रॅब्युलन यांचं मॅच फिक्सिंग झालं आहे. त्यांचं आधीच ठरवल्याप्रमाणे निकाल लागेल. माननीय पंतप्रधान रोड शो करायला येत आहेत. मुख्यमंत्री दाओसला निघणार आहेत. यावरुन दिसून येत आहे की या संदर्भातील मॅच फिक्सिंग कोणत्या स्तराला गेलं आहे. आज काय होईल हा फक्त औपचारिकपणा आहे,” असं राऊत म्हणाले.
2 पक्ष फोडण्यात आले
“सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की शिंदे गटाने नेमलेला व्हीप बेकायदेशीर आहे. सुनील प्रभूंचा व्हीप कायदेशीर आहे. त्यांचा व्हीपच बेकायदेशीर असल्याने प्रत्येक निर्णयच बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी झालेली निवडच बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे सरकारमध्ये बसले आहेत. राज्यापालांची प्रत्येक कृती आणि कारवाई चुकीची आहे. त्यामुळे बहुमताच्या प्रत्येक गोष्टीपासून घडलेली घटना चुकीची आणि बेकायदेशीर आहे. हे सरकार बेकायदेशीरपणे राज्य करत आहे. त्यांना राज्य करु दिलं जात आहे. त्यासाठी 2 पक्ष फोडण्यात आले. पक्षांतर घडवण्यात आलं. पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपयांचा वापर करण्यात आला. आज नाइलाजास्तव त्यांना आज निर्णय द्यावा लागत आहे,” असा दावा राऊत यांनी केला आहे.