कल्याण पूर्वेतील शिवाजीनगरमधील वालधुनी प्रभागात मंगळवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान एका भटक्या श्वानाने तासाभरात आठ जणांना चावा घेतल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. श्वान चावलेल्यांमध्ये एक दाम्पत्य, विद्यार्थी, पादचारी यांचा समावेश आहे. वालधुनी भागात भटक्या श्वानांचा वावर अधिक प्रमाणात आहे. मंगळवारी रात्री अचानक एक श्वान अचानक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना चावू लागला. श्वान चावल्याचा आरडाओरडा झाल्यावर या भागातील रहिवासी रस्त्यावर आले. परंतु या गर्दीतच भटका श्वान घुसला आणि त्याने अचानक नागरिकांना चावण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमलेल्या नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.
या घटनेनंतर माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी श्वानाने चावा घेतलेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या नागरिकांना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात श्वान दंशावर इंजेक्शन देण्यात आले. त्यातील तिघांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. अजित आढाव, सुनिता जाधव, सुनील जाधव, संगीता अहिरे, पार्थ देशमुख, तेजस अहिरे, शबनम शेख, आनम शेख, रियास शेख अशी श्वान चावलेल्या रहिवाशांची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वीच टिटवाळा येथे भटक्या श्वानाने सात जणांना चावा घेतला होता. शहरातील भटके श्वान पकडणाऱ्या एजन्सीचे काँट्रॅक्ट गेल्याच महिन्यात संपले आहे. नवीन एजन्सी अजून नेमली गेलेली नाही. त्यामुळे शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढू लागला आहे.
गेल्या महिन्यात संपली आहे. नवीन एजन्सी नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या एजन्सीने काम संपल्याने भटकी कुत्री पकडण्याची काम थांबवले आहे त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी माहिती एका सूत्रांनी दिली.
The post कल्याणमधील वालधुनी भागात भटक्या श्वानाचा आठ जणांना चावा appeared first on Loksatta.