युक्रेन आणि रशिया यांच्यात आठव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. बुधवारी, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दोन सूचना जारी केल्या होत्या, ज्यात भारतीयांना खार्किव सोडण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युद्ध सहा तासांसाठी थांबवल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त होते. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तांचे खंडन करत आमच्या विनंतीवरून युद्ध थांबलेले नाही असे म्हटले आहे. “युद्ध आमच्या सांगण्यावरून थांबले असे नाही. हे म्हणजे आमच्या सांगण्यावरून पुन्हा बॉम्बफेक सुरू होईल की काय, असे आहे. मी या अहवालांवर भाष्य करू शकत नाही,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.
“खार्किव आणि सुमी येथून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आम्ही युक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आमचा अंदाज आहे की आमच्या सल्ल्यानंतरही काहीशे भारतीय अजूनही खार्किवमध्ये आहेत,” असे बागची पुढे म्हणाले.
बुधवारच्या सल्ल्यानुसार, मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी खार्किव सोडले, ते जवळच्या पेसोचिनमध्ये आहेत आणि त्यांची संख्या अंदाजे १,००० आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. खार्किव सोडल्यानंतर पेसोचिनमध्ये आलेल्या भारतीयांना युक्रेनच्या पश्चिम भागात हलविण्याचे काम करत आहे.
“युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर सुमारे १८,००० भारतीय युद्धग्रस्त देश सोडून गेले आहेत. आमची पहिली अॅडव्हायझरी जारी झाल्यापासून एकूण १८,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनची सीमा सोडली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत ३० उड्डाणांनी ६,४०० भारतीयांना युक्रेनमधून परत आणले आहे. पुढील २४ तासांत १८ उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.
The post भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवले?; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले सत्य appeared first on Loksatta.