अहमदनगरः मानवी वस्तीत बिबट्या (Leopard) शिरल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. मुंबई, पुणे, अहमदनगर तर विदर्भातील बहुतांश भागात शेतात व गावात बिबट्यांचा वावर आढळतो. अहमदनगरमध्ये मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. (Leopard Attacked On Sleeping Dog)
सीसीटिव्ही व्हिडिओ व्हायरल
घराबाहेर बसलेल्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला हुसकावून लावल्याने हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ चर्चेत आला आहे. बिबट्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताच कुत्र्याने मात्र शिताफिने त्याला रोखले आणि माघारी परतवले. त्यामुळं सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.
दबक्या पावलांनी आला अन्…
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात हा प्रकार घडला आहे. एका घराच्या बाहेर एक बिबट्या घुटमळताना दिसत आहे. रात्रीच्या आंधारात तो दबक्या पावलांनी घराकडे येताना दिसत आहे. दरवाजातच बसलेल्या कुत्र्याला पाहताच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. मात्र, सावध असलेल्या कुत्र्याने बिबट्याचा हल्ला परतवून लावला आहे. तसंत, जोर-जोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याच्या आवाजाने घरातील लोकही जागे व्हायला लागले. हे पाहताच कुत्र्याने घाबरुन धूम ठोकली. वन विभागाने या घटनेचा सीसीटिव्ही फुटेज शेअर केला आहे.
कर्नाटकातही घडला असाच प्रकार
दरम्यान, जानेवारी महिन्यातदेखील असाच एक प्रकार कर्नाटकातील रामनगर येथे घडला होता. बिबट्याचा हल्ला परतवून लावून कुत्र्यांने स्वतःचा जीव वाचवला होता. त्याचाही सीसीटिव्ही व्हिडिओ व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर मात्र या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. काहींनी या व्हिडिओची मज्जा घेतली आहे. तर, काही नेटकऱ्यांनी कुत्र्याच्या धाडसाचे कौतुकही केले आहे. तर, घरापर्यंत बिबट्या आल्याने पुन्हा एकदा रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Maharashtra: A dog scared away a leopard that entered the rural area of Rahuri taluka in Ahmednagar.
(Video Source: Forest Department) pic.twitter.com/NkhLcZWmNy
— ANI (@ANI) June 28, 2023
बिबट्यांचा संचार
नगर जिल्ह्यात नागरी वस्तीत बिबट्यांचा संचार वाढला आहे. शेतकरी वर्गालाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतात हल्ला करणारा बिबट्या आता घरात घुसू लागला आहे. त्यामुळं रात्रीची शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच, काहि ठिकाणी दिवसाही बिबट्यांचा वावर वाढला आहे. माणसांवरही हल्ले वाढल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.