नागपूर : सण-उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला जाणार असून अनेकांची धरपकड सुरू आहे. कुणीही कायदा हातात घेण्याच्या प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ते वनामतीच्या सभागृहात आयोजित केंद्रीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. होळी, धुळवड आणि शब-ए-बारात हे उत्सव एकोप्याने साजरे व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी केंद्रीय शांतता समितीची बैठक आयोजित केली. या बैठकीत शहरातील शेकडो समिती सदस्यांनी पोलीस आयुक्तांसमोर समस्या आणि तक्रारींचा पाढा वाचला.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या नेतृत्वात पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे यांनी बंदोबस्ताची चोख आणखी केली आहे. होळीच्या दिवशी सकाळपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. महिला व तरुणींची छेड काढणाऱ्यांना कोठडीत डांबण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी स्थानिक पोलीसांना गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
फुगे फेकणाऱ्यांवर गुन्हे
होळी-धुळवडीदरम्यान रंगाचे फुगे फेकून मारणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कोठडीत डांबण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. दीडशे गुन्हेगारांची धरपकड
गेल्या दहा वर्षांत होळी व धुळवडीत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. होळी संपेपर्यंत त्यांना कारागृहात डांबले जाईल, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.
पोलिसांनो, वागणूक सुधारा
अनेकांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भाषा आणि वागणुकीबाबत तक्रारी केल्या. वाहन पकडल्यानंतर पोलीस खूप खालच्या दर्जाची भाषा वापरतात. तसेच अनेक पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारांना सोबत घेऊन चहापाणी घेतात. त्यावर पोलीस आयुक्तांनी पोलिसांचे वर्तन सुधारण्यासंदर्भात उपायुक्तांना सूचना केली.