देवेंद्र फडणवीस म्हणतात, “संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मला का बोलावलं’ म्हणत राहतात”
विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आज दुपारी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर दोन तास चौकशी देखील करण्यात आली. या चौकशीदरम्यान आपल्याला सहआरोपी करण्याचा प्रयत्न असल्यासारखे प्रश्न विचारल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या चौकशीबाबच संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटवर देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी खोचक शब्दांत निशाणा साधला.
दोन तास चौकशी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन परखड शब्दांमध्ये टीका केली. “मला नोटीस पाठवण्यामागचं कारण सभागृहात मी मांडत असलेले विषय आहेत. दाऊदसोबत सरकारच्या मंत्र्यांचं कनेक्शन किंवा विरोधी पक्षाबाबत सरकार करत असलेलं षडयंत्र हे विषय मी काढले. म्हणून अचानक अशी नोटीस मला देण्यात आली”, असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.
संजय राऊतांवर निशाणा
दरम्यान, संजय राऊतांनी फडणवीसांच्या चौकशीआधी आज सकाळी खोचक ट्वीट करून “तुम्ही का घाबरताय?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यावरून फडणवीसांनी टोला लगावला आहे. “मी त्यांनाच विचारतोय की मी तर मोकळेपणाने म्हटलं मी चौकशीसाठी तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेत राहतात. रोज केंद्रीय यंत्रणांवर आरोप करतात. मी स्वत:हून म्हटलं मी चौकशीला यायला तयार आहे. त्यांच्यात आहे का हिंमत हे बोलायची? ते रोज ‘मला का बोलावलं’ म्हणत राहतात”, असं फडणवीस म्हणाले.
दोन तासांच्या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मला विचारलेले प्रश्न…”!
फडणवीसांचा राऊतांना सवाल
“संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन घोषित केलं की प्रिव्हिलेज असूनही ते न वापरता चौकशीला जाणार आहे. पण माझा सवाल आहे की संजय राऊतांवर अशी परिस्थिती आल्यावर ते का घाबरतात. ते रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मला का बोलावता’ असं का विचारत राहतात?” असा सवाल देखील फडणवीसांनी केला आहे.