कामगारांना रेल्वेच्या पडीक कॉटर्समध्ये डांबून ठेवून मारहाण देखील करण्यात आली होती.
कल्याण पूर्व येथील रेल्वेच्या मालगाडी थांब्यावरील जमिनीला संरक्षक भिंत बांधण्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील ठेकेदाराकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजय कदम आणि एस.जगताप असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मेसर्स एस. बी. खंकाळा कंपनीच्या माध्यमातून कल्याण पूर्वकडील रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम घेतलेल्या ठेकेदाराच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार ठाण्यातील नौपाडा भागात राहतो. रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम सुरु केल्यानंतर विजय कदम याने बांधकामाच्या ठिकाणी येऊन पैशांची मागणी केली. काम बंद होऊन नुकसान होऊ नये म्हणुन कंपनी व्यवस्थापकाने विजय कदम याला त्याच्या मागणीनुसार ५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर विजय हा व्यवस्थापकाला पुन्हा धमकावून पैशाची मागणी करत होता. ठेकेदाराने विजयला प्रतिसाद न दिल्याने विजय कदम व त्याच्यासोबत असलेले ३ व्यक्तींनी खंडणी वसूल करण्यासाठी कल्याणच्या रेल्वे यार्ड या साईटवर काम करत असलेल्या कामगारांना आनंदवाडीतल्या रेल्वेच्या पडीक कॉटर्समध्ये डांबून ठेवून मारहाण केली. याशिवाय १० दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास कामगारांचा जीव घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध घेऊन आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.
कल्याण न्यायालयाने या दोघांना चौकशीकरिता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. डोके करत आहेत.