मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या (Mumbai University Law Courses) सत्र परीक्षा तोंडावर आल्या असताना, अद्यापही विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तसेच २९ नोव्हेंबरला नियोजित असलेली परीक्षा होणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी परीक्षेपूर्वी विद्यापीठाकडे अर्ज दाखल करणे आवश्यक असते. मात्र, काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात अडचण येत आहे. परीक्षेचे अर्ज अजून भरून झालेले नाहीत. त्यामुळे प्रवेशपत्र मिळण्याबाबत गोंधळ आहे, असे विधी अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
‘एमकेसीएल’च्या सॉफ्टवेअरमध्ये गुण दिसत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येत नसल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींचे म्हणणे आहे. परीक्षा तोंडावर आली असताना ही तांत्रिक अडचण सुटली नसल्याने परीक्षा देता येणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परीक्षेला नऊ दिवस उरलेले आहेत. अद्याप विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही.
असे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाने यावर तोडगा काढावा. अन्यथा विद्यार्थ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री अमित ढोमसे यांनी दिला. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली असता, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांना २५ आणि २६ नोव्हेंबरला प्रवेशपत्र दिले जाईल. विद्यापीठाकडून कोणतीही तांत्रिक अडचण नाही. जी काही तांत्रिक अडचण आहे, ती महाविद्यालयांकडून आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे जावे. महाविद्यालय त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळतील, असे विद्यापीठाने सांगितले आहे.