भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केलं होतं, संजय राऊतांची टीका
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेला प्रस्ताव हा कटाचा भाग असून तो उधळून लावण्याचं आवाहन केलं. या बैठकीत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतना सडकून टीका केली.
“उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. आम्ही १९ जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. मी नागपुरात जाणार आहे. जिल्ह्यांचं वातावरण ढवळून काढलं जाणार असून भाजपाकडून आमच्याविरोधात जे गैरसमज पसरवले जात आहेत, त्यांचा जळफळाट जो बाहेर पडत आहे त्याला उत्तर द्यायचं आहे. उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल मार्गदर्शन केलं,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
“कसली जनाबसेना…शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे आणि राहील. शिवसेनच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ झालेली नसून, होऊ देणार नाही. आम्हाला जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासून पहावी,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.
“काश्मीरच्या संदर्भात आज जे आम्हाला अक्कल शिकवत आहेत त्याच भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केलं होतं. मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केलं? आम्ही तेव्हादेखील हे पाकिस्तानवादी, फुटीरवादी असल्याचं सांगत होतो. काश्मीरमधील हुतात्म्यांचा, पंडितांचा अपमान करु नका आम्ही सांगत होतो. त्यामुळे जनाबसेनावाले खरे कोण हे आम्ही महाराष्ट्रात जाऊन सांगू,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.