यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली.
नागपूर : नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) चार वर्षांचा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करणार असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट पीएच.डी.ला प्रवेश मिळणार आहे. तसेच यापुढे पीएच.डी.च्या ६० टक्के जागा या ‘नेट’ आणि ‘जेआरएफ’ पात्र उमेदवारांसाठी राखीव राहणार आहेत. तर उर्वरित ४० टक्के जागा विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांमधून भरल्या जातील.
यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली. या नवीन सुधारणांच्या आराखडय़ाला बैठकीत मंजुरी देण्यात आली असून तो जनतेच्या सूचनांसाठीही ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या वतीने नेट आणि जेआरएफ परीक्षा घेतली जाते. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना थेट पीएच.डी.ला प्रवेश दिला जातो. मात्र, अनेक विद्यापीठांमध्ये मार्गदर्शकांनी त्रुटींचे कारण दिल्यामुळे पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाही पीएच.डी.ला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे आता नवीन सुधारणांनुसार नेट, जेआरएफ पात्र विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी.च्या ६० टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. तर अन्य ४० टक्के जागा या प्रवेश परीक्षांमधून भरल्या जाणार आहेत.
नव्या पदवी अभ्यासक्रमाचे फायदे..
पदवी अभ्यासक्रम हा तीन किंवा चार वर्षांचा राहणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एक वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा थेट पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरेल. हा नवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांला अभ्यासक्रम मधात सोडता येईल. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांने चार वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि मध्येच त्यांनी अभ्यासक्रम सोडला तर त्याला सोडलेल्या वर्षांपासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल.