“काय बोलावं की कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही”. असंही राणेंनी बोलून दाखवलं.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली आहे. त्यावरुन आता भाजपाने नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंचे उदाहरण देत भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता नारायण राणेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
मालवणी पोलीस स्टेशनमधून नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, “शरद पवार यांचे मी काही विधान ऐकले, ते म्हणाले नारायण राणेंनाही अटक झाली होती. त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा का घेत नाही. वा… पवार साहेब, काय बोलावं की कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही. आमचा कोणी दाऊद दोस्त नाही आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहे आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत. त्या दाऊशी नवाब मलिकचे संबंध आहेत म्हणून त्याला अटक झाली, म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत. तुम्ही आमचे राजीनामे मागताय, हेच तर केलं आयुष्यभर हीच तर तुमची पुण्याई आहे. म्हणून आम्ही या देशाचे नागरिक असून, या देशाचे प्रतिनिधी आहोत, आम्ही इथे होणाऱ्या अन्याविरोधात आवाज उठवणार म्हणून आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही.” असं म्हणत नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानावर प्रत्युत्तर दिलं.
Disha Salian Case : “शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर… ; नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर राणेंचं माध्यमांसमोर विधान!
तर, “नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक करण्यात आली आहे. गेली २० वर्षे नवाब मलिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्याकाळ हे सर्व दिसले नाही. एखादा मुस्लीम कार्यकर्ता असला की त्याला दाऊदाचा जोडीदार म्हटले जाते. कारण नसताना आरोप केले जात आहेत. मला त्याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले होते.
.…तेव्हा मंत्रिमंडळातून काढलं नाही; मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी भाजपाला दिला नारायण राणेंचा दाखला
तसेच,“नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्यांना आणि कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे आणि याच्याविरोधात आम्ही संघर्ष करु. नवाब मलिकांना अटक केल्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मला काळजी एकच आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे सहकारी नारायण राणे यांनाही अटक केल्याचे वाचनात आले होते. नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे माझ्या पाहण्यात आले नाही. एक न्याय तुम्ही नारायण राणेंना लावता आणि दुसरा न्याय मलिकांना लावता. याचा अर्थ हा सगळा राजकीय हेतूने सुरु असलेला उद्योग आहे.” असंही शरद पवार यांनी बोलून दाखवलं होतं.