मुंबई : सरकारबरोबरील पत्रप्रपंच, विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, विधेयके फेरविचारार्थ परत पाठविणे यापाठोपाठ अभिभाषण अर्धवट करणे यातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायमच महाविकास आघाडी सरकारशी संघर्षांची भूमिका घेतली आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भवितव्य आता अंधकारमय झाले आहे.
सरकारी विमानातून खाली उतरविण्यात आल्याने राज्यपाल कोश्यारी यांचा जळफाट झाला होता. अभिभाषण अर्धवट सोडून त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली. विधानसभा अध्यक्षपदाची ९ मार्चला निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची योजना आहे.
विधानसभा नियमातील ६ (१) कलमानुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख हे राज्यपाल निश्चित करतात. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज्यपालांनी नियमात करण्यात आलेले बदल बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करीत निवडणुकीला मान्यता दिली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या घोषणाबाजीमुळे राज्यपाल संतप्त झाले आहेत. यातूनच अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांकडून पुन्हा एकदा कोलदांडा घातला जाईल, अशी शक्यता सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध
मुंबई : सभागृहातील गोंधळाचे निमित्त करून अभिभाषण अर्धवट सोडून व राष्ट्रगीतासाठीही न थांबता सभागृहाबाहेर निघून जाण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध करण्यात आला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. त्यानुसार विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात अभिभाषणासाठी राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन होताच, सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू झाली. राज्यपालांनी भाषण वाचण्यास सुरुवात केली, परंतु सभागृहातील घोषणाबाजी व गोंधळाचे वातावरण बघून त्यांनी अवघ्या दोन मिनिटांत भाषण अर्धवट सोडून, ते तडक सभागृहाबाहेर निघून गेले.
विधान भवनात नंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या वर्तनाचे पडसाद उमटले. अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली नाही, तर भाजपच्याच सदस्यांनी गोंधळ घातला, परंतु राज्यपालांनी गोंधळाचे निमित्त करून अभिभाषण अर्धवट टाकून सभागृहातून निघून जाणे, हा पूर्वनियोजित त्यांचा कार्यक्रम होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मागील दोन वर्षांत आघाडी सरकारने केलेली चांगली कामगिरी जनतेपर्यंत जाऊ नये, त्यासाठी राज्यपाल भाषण न करता निघून गेले असावेत, अशी शंका काही मंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडून सभागृहातून तडकाफडकी निघून जाणे, राष्ट्रगीतासाठीही न थांबणे या त्यांच्या अवमानकारक कृतीचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या संदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपालांच्या या वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त करण्याचे पत्र राष्ट्रपतींना पाठिवण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रपतींना लवकरच नाराजीपत्र .. सभागृहातील गोंधळाचे निमित्त करून अभिभाषण अर्धवट सोडून व राष्ट्रगीतासाठीही न थांबता सभागृहाबाहेर निघून जाण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध करण्यात आला. राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या या अवमानकारक वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यपाल व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
The post विधानसभा अध्यक्षपद निवडणूक अधांतरी? appeared first on Loksatta.