घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधासह इतर कलमांखाली नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुलीवंदनाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील उक्रूळ येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान अपघात होऊन दौलत बाजीराव देशमुख या ६६ वर्षीय जेष्ठ नागरीकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधासह इतर कलमांखाली नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुलीवंदनाचे औचित्य साधून या बैलगाडी स्पर्धेचे सकाळी साडे दहा ते दुपारी तीन दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या या स्पर्धे दरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली. यात दौलत बाजीराव देशमुख गंभीररीत्या जखमी झाले. डोक्याला गंभीर दुखापत होऊनही त्यांना आयोजकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही. शेवटी काही जणांनी मोटर सायकलवर त्यांना नेऊन रायगड रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांना पनवेल येथे दाखल करण्यास सांगण्यात आले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अखेल रविवारी दुपारी नेरळ पोलीस ठाण्यात बैलगाडी स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भा.द.वि कलम ३०४ अ,२७९,३३७, ३३८, १८८, २६९, २७०, २७१, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) चे उलंघन १३५ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५,१, प्राण्यांना क्रूरतेने वागणूक प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११(१),(क) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक तेंडुलकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.