सायली शहासने या तरुणीची वसईतील स्टेटस लॉजमध्ये हत्या करून फरार झालेला प्रियकर सागर नाईक याने बिहारच्या मुज्झफर नगर येथील एका लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता.
वसईच्या वसंत नगरी येथे राहणार्या सागर नाईक (२८) आणि सायली शहासने (२६) या तरुणीचे प्रेमसंबंध होते. शनिवार २६ फेब्रुवारी रोजी तो सायलीला घेऊन वसईच्या स्टेटस लॉजमध्ये आला होता. त्यावेळी सागरने सायलीच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून हत्या केली आणि फरार झाला होता. त्याने आपला मोबाईल बंद केला होता. त्यानंतर सागरने बिहारच्या मुज्फरनगर येथील आस्था या हॉटेलमध्ये शनिवारी एक खोली घेतली होती. रविवारी रात्री सागरने खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. तो बिहारवरून सीमा ओलांडून नेपाळला जाण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती त्याच्या मोबाईल मधून पोलिसांना मिळाली आहे.
बिंग फुटेल म्हणून केली हत्या…
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. सागरची प्रेयसी सायली ही अभियंता होती आणि चांगल्या पगारावर कामाला होता. सागरने मेकॅनिकल अभियंता असल्याचे सांगितले होते. मात्र तो प्रत्यक्षात अभियंता नव्हता. त्याच्या कुटुंबियांपासून देखील त्याने ही माहिती लपवून ठेवली होती.
दरम्यान, सायलीने लग्नासाठी आग्रह केला होता. तिची समजूत काढण्यासाठी त्याने जानेवारी २०१९ मध्ये गूपचूप मंदिरात लग्न केले होते. परंतु जाहीरपणे लग्न करण्यासाठी सायली सतता सागरच्या मागे लागली होती. सागर अभियंता नसल्याने त्याला नोकरी नव्हती. त्यामुळे लग्न केलं तर आपले बिंग फुटेल अशी त्याला भीती होती. म्हणून त्याने सायलीची हत्या केली असावी अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली.
सागर हा नोकरी नसल्याने वैफल्यग्रस्त होता. त्यातच त्याल ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद लागला होता. तो केलॉन नावाचा गेम तासनतास खेळायचा. त्यामुळे तो विक्षिप्त झाला होता, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ए.एच. देसाई यांनी दिली.
…आम्ही त्याला पकडून शकलो नसल्याची आयुक्तांची कबुली
आठ दिवस सागर पोलिसांना चकमा देत होता. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. हे आमचं अपयश असल्याची कबुली पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिली. सागर हा अट्टल गुन्हेगार नव्हता. आम्ही कसोशीने प्रयत्न करत होतो. पण त्याला वेळीच पकडण्यात आम्हाला अपयश आलं असे दाते यांनी सांगितले. पोलिसांना चकमा देण्यासाठी सागरने सर्व खबरदारी घेत होता. शुक्रवारी फक्त त्याने काही वेळेसाठी आपला मोबाईल सुरू केला होता. त्याने कॅलिफोर्निया येतील एका कंपनीचा पेड इंटरनेटा (व्हिपीएन) वापरत होता. त्यामुळे पोलीस त्याचा आयपी पत्ता शोधू शकले नव्हते.
The post वसईमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकाराची बिहारमध्ये आत्महत्या; समोर आले हत्येचे धक्कादायक कारण appeared first on Loksatta.