ज्या कनिष्ठ महाविद्यालयात अथवा शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था परीक्षा मंडळाने केली आहे. प्रश्नपत्रिका संच यावर्षी प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या समोरच उघडण्याच्या सुचना परीक्षा मंडळाने दिलेल्या आहेत. विद्यार्थी, पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास व घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे. करोनामुळे यावर्षी परीक्षा केंद्राची संख्या वाढली आहे.
यंदा १० हजार २७८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे नऊ हजार ६३५ परीक्षा केंद्रांवर परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. करोना प्रादुर्भावामुळे परीक्षेच्या केंद्रांत वाढ करण्यात आली असून, परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, विशेष महिला पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
यंदा प्रथमच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी बुधवारी (तीन मार्च) सकाळी ११ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज विलंब शुल्क न आकारता स्वीकारण्यात आले. मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात येणारे नैराश्य, दडपण दूर करण्यासाठी दहा समुपदेशकांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेता येणार नाही.
विद्यार्थ्यांनी केवळ मंडळाने वेबसाइटवर प्रसिद्ध केलेले छापील वेळापत्रक ग्राह्य धरावे; तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
काही पेपरच्या वेळा बदलल्या
राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च २०२२ या दिवश होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल २०२२ रोजी होणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर
परीक्षेच्या कालावधीत दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये एक किंवा दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.