पापलेट, कोळंबी व सुरमई या मासळींचे दर किलोला एक हजार ते १२०० रुपयांवर पोहचले आहेत.
उरण : होळी व धुळवडच्या निमित्ताने खवय्ये मासळीला पसंती देतात. मात्र या वर्षी मासळीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आवक घटल्याने मासळी महाग झाली आहे. पापलेट, कोळंबी व सुरमई या मासळींचे दर किलोला एक हजार ते १२०० रुपयांवर पोहचले आहेत.
मासळीचे घटते प्रमाण, सातत्याने वातावरणातील बदल, शासनाच्या जाचक अटी, मच्छीमारांचे रखडलेले अनुदान आदी कारणांमुळे मासळी आवक घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
होळी आणि धुळवडीच्या दिवशी कुटुंबीय, नातेवाईक एकत्र येतात. या दिवशी मटण, मासे याला मागणी असते. समुद्रकिनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडून आपल्या आवडत्या मासळीचा आस्वाद घेतला जातो. समुद्र किनाऱ्यालगत तसेच शेजारील शहरात राहणाऱ्या नागरिकांकडूनही मासळीचा आस्वाद घेतला जातो. मात्र यावर्षी त्यांना मासळीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. ४०० ते ६०० रूपये किलो असलेल्या कोळंबीचा दर एक हजार रुपये. सुरमई व पापलेट ६०० ते ७०० रुपयांवरून १२०० रुपयांवर पोहचला आहे.
सध्या मासळीचा मोठा हंगाम नाही. त्यात होळीसाठी बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे मासळीच्या प्रमाणात घट झाल्याने दरात वाढ झाली आहे. साध्या मासळीवर समाधान मानावे लागत आहे. होळीनंतरच आवक वाढ होण्याची शक्यता आहे.सुधीर पाटील, मच्छीमार