![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/05/761749-sudha-murty.jpg)
इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty) आपल्या उच्च विचार आणि साधं राहणीमान यासाठी ओळखल्या जातात. फक्त भारतच नाही तर जगभरात त्यांना मानणारे अनेक तरुण-तरुणी आहेत जे त्यांना आदर्श मानतात. सुधा मूर्ती राज्यसभेच्या खासदारही आहेत. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी 30 वर्षांत एकही साडी विकत घेतली नसल्याचा खुलासा केला आहे. वाराणसीच्या काशी दौऱ्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
The Voice of Fashion ला दिलेल्या मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी सांगितलं की, “जेव्हा तुम्ही काशीला जाता तेव्हा आपल्याला आवडणारी एखादी वस्तू सोडून द्यावी असं म्हणतात. मला शॉपिंग करायला फार आवडायचं. त्यामुळे मी गंगेला आश्वासन दिलं की, मी आयुष्यभरासाठी शॉपिंग करणं सोडून देईन”.
73 वर्षीय सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं की, या वचनामागे आपलं संगोपनही कारणीभूत होतं. याचं कारण त्यांचे आईवडील आणि आजी-आजोबा कमीत कमी संपत्तीसह काटकसरीचे जीवन जगत होते.
“सहा वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या आईचे निधन झाले, तेव्हा तिच्या कपाटातील वस्तू द्यायला आम्हाला फक्त अर्धा तास लागला. कारण तिच्याकडे फक्त 8 ते 10 साड्या होत्या. 32 वर्षांपूर्वी माझी आजी गेली तेव्हा तिच्याकडे फक्त चार साड्या होत्या. ते माझ्या संगोपनाचा एक भाग असल्याने, कमी मालमत्तेसह साधं जीवन स्वीकारणे मला सोपं वाटलं,” असं त्यांनी सांगितलं.
दोन दशकांहून अधिक काळापासून सुधा मूर्ती त्यांच्या बहिणी, जवळचे मित्र-मैत्रीण तसंच त्यांच्या एनजीओने भेट म्हणून दिलेल्या साड्या नेसतात. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूंपैकी दोन हाताने भरतकाम केलेल्या साड्या आहेत ज्या स्त्रियांच्या एका गटाने त्यांना दिल्या आहे. या महिलांच्या जीवनात त्यांनी इन्फोसिस फाऊंडेशनसोबत काम करून परिवर्तन घडवून आणलं.
त्यांच्या बहिणी सुरुवातीला त्यांना दरवर्षी दोन-तीन साड्या भेट देत अस. पण नंतर सुधा मूर्ती यांना आपल्याकडे आता प्रमाणापेक्षा जास्त साड्या झाल्या आहेत असं वाटलं. “मी त्यांना आता मला भेट देणं भरपूर झालं, माझ्याकडे आधीच खूप आहे असं सांगितलं,” अशी माहिती त्यांनी दिली.
“मी 50 वर्षांपासून साडी नेसत आहे आणि मी नेहमी हे सुनिश्चित करते त्या जास्त काळ टिकतील. मी माझ्या साड्या इतक्या खाली नेसत नाही की त्या जमिनीच्या संपर्कात येतील. त्यामुळे त्या खराब होत नाहीत आणि जास्त काळ टिकतात,” असं त्यांनी पुढे सांगितलं,