यंदाच्या बारावी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आता एका आठवड्याची मुदत उरली आहे. नियमित शुल्कासह २५ नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज भरावयाचे होते. त्याकरिता ५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज न भरल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली होती.
त्यानुसार, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज भरणे सुरू केले होते. मात्र, मंडळाच्या ज्या संकेतस्थळावरुन हे अर्ज करावयाचे होते, त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील चार ते पाच दिवसांपासून अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन बारावीचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी आता १५ नोव्हेंबरऐवजी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विलंब शुल्क देऊनही विद्यार्थ्यांना आपले ऑनलाइन अर्ज भरता येतील. त्याकरिता २६ ते ३० नोव्हेंबर असा कालावधी देण्यात आला आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजांनी चलन काढून शुल्क बॅँकेत भरावयाची मुदत २ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
या नंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अतिविलंब शुल्काने अर्ज भरावयाच्या तारखा नंतर कळविण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांकडे अर्ज भरण्यासाठी हा अखेरचा आठवडा उरला आहे.