Jayaprabha Studio : “…तर मी राजकीय संन्यास घेईन ; आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या ”

Jayaprabha Studio : “…तर मी राजकीय संन्यास घेईन ; आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या ”


शिवसेना नेते व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केली भूमिका ; मुलांनी केलेल्या व्यवहाराची मला अजिबात कल्पना नव्हती असंही म्हणाले आहेत.

कोल्हापुरमधील जयप्रभा स्टुडिओ आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाची मागणीवरून सध्या कोल्हापुरातील वातावरण चांगलच तापलं आहे. एकीकडे जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणी वाढत असताना, दुसरीकडे या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेते राजेश क्षीरसागर मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केलेली असल्याचे समोर आले आहे. तसेच, जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी आजपासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही केली आहे. या सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याकरिता कोल्हापुरकर आक्रमक ; खरेदीदारांच्या कार्यालयावर शाई फेकून निषेध!

माध्यमांशी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले की, “व्यवहारात बेकायदेशीर काय झालं? माझ्या मुलांनी जर काही बेकायदेशीर केलेलं आढळलं, तर त्यासाठी मी जबाबदार असेल. तसं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन. माझ्या घरातील व्यक्तीने जर काही बेकायदेशीर केलं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन आणि मुलांना देखील राजकारणाचा त्याग करायला सांगेन. भारतीय राज्यघटनेने एखादी खासगी जागा खरेदी आणि विक्रीचा अधिकार या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. त्या पद्धतीने हा व्यवहार झालेला आहे. फक्त जनतेच्या भावनांचा आदर करून आपण सर्व योग्य ते निर्णय घेणार. परंतु या उलट देवस्थान समितीची जागा त्या ठिकाणी मोफत शिक्षण होईल, अशा पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालयं बांधली जातात. त्या ठिकाणी दहा-दहा कोटी रुपये डोनेशन घेतलं जातं आणि मोठाले डॉक्टर घडवले जातात. हा उद्देश पाळला गेला का? एक रुपयाला एवढी मोठी जागा, यांना कोण विचारणार? कोट्यावधी रुपये डोनेशन घेतलं जातं. आज महापालिकेची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, कोट्यावधी रुपयांचा घरफळा बुडवला जातो. यावर कोणी विचारलं पाहिजे ना?”

हेही वाचा :  वरंध घाटात पुन्हा अपघात; रस्ता चुकल्याने कार 40 फूट खोल दरीत कोसळली

मी स्वाभिमानी नक्कीच आहे परंतु अहंकारी नाही –

तसेच, “आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या, मी स्वाभिमानी नक्कीच आहे परंतु अहंकारी नाही. माझं चुकलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे. माझी मुलं चुकली असतील तरी माफी मागायला तयार आहे. परंतु माझी भूमिका समजून घ्या. या राज्यघटनेने प्रत्येकाला बेकायदेशीर नव्हे कायदेशीर खरेदी-विक्रीचा अधिकार दिलेला आहे.” असं राजेश क्षीरसागर म्हणाले.

जनतेच्या भावनांचा आदर करूनच पुढील निर्णय घेतला जाईल –

याचबरोबर, “आपल्या सर्वांना माहिती आहे कोण काय करतय. मला मागील विधानसभेत पाडण्यासाठी षडयंत्र रचलं गेलं, बदनाम केलं गेलं. कोणी केलं? कारण, एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक जर पालकमंत्री झाला निवडून येऊन, तर मी यांचे धंदे बंद केले असते. यांनी दोन वर्षे सत्तेत राहून काय केलं? किती रुपये निधी आणला दाखवावं? शहरासाठी काय केलं? स्वत:चे व्यवसाय चालावे यासाठी काहीजण राजकारण करत असतात. राजकारण हा माझा धंदा नाही मी सेवा म्हणून काम करतोय. माझ्या सारखी व्यक्ती जर मोठ्या पदावर गेली तर परत यांचं अस्तित्व राहणार नाही, या भितीमधून त्यांनी माझ्यावर २०१९ मध्ये आरोप केले होते आणि आज देखील जर पाहीलं तर या दोन वर्षात या जनतेसाठी मी लढतोय. या करोनाच्या काळात मी एवढा व्यस्त होतो, मी एवढी सेवा केली मला माहितीच नाही हे काय सुरू आहे. जयप्रभाचं महालक्ष्मी स्टुडिओमध्ये रुपांतर झालं, अजिबात मला माहिती नाही. कारण माझा मुलगा सज्ञान आहे. त्याचा बांधकाम व्यवसाय आहे. जर त्याने बेकायदेशीर असं काही केलं असेल, तर मी त्याल आजच्या आझ जनतेची माफी मागायला सांगितलं असतं. परंतु यामध्ये बेकायदेशीर असं काहीच नाही. सगळं कायदेशीररित्या झालेलं आहे, खासगी जागा आहे. तरी देखील आजपर्यंत मी आणि माझं कुटुंब जनतेच्या भावनांचा आदर करत आलेलं आहे. निश्चितपणे जनतेच्या भावनांचा आदर करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.” असंही शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यावेळी म्हणाले.

हेही वाचा :  ‘तारक मेहता…’ फेम बबीताने सुरु केलं रेस्टॉरंट, अभिनय क्षेत्राला करणार रामराम?

स्टुडिओचं कुठलंही अस्तित्व मिटवलं जाणार नाही हा माझा शब्द आहे –

तर, “निश्चितपणे स्टुडिओचं जतन आणि संवर्धन व्हावं अशी माझी देखील भावना आहे. जनतेच्या भावनांचा मी आदर करतो आणि जनतेच्या भावनांबरोबर मी देखील आहे. पण एखादी खासगी मालमत्ता आपण घेत असताना, सर्व नियम पाळून जर होत असेल, तर त्या ठिकाणी स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं संपूर्ण जागेवर स्मारक व्हावं अशी आमची भूमिका आहे. मी आपल्याला आश्वासित करतो शब्द देतो की स्टुडिओचं कुठलंही अस्तित्व मिटवलं जाणार नाही. या शहरात ज्या ज्यावेळी आघात झालेला आहे, संकट झालेलं आहे, आजपर्यंत मी माझ्या जनतेच्यावतीने त्या संकटाला सामोरं गेलेलो आहे. हे संकट समजून त्या ठिकाणी स्टुडिओचं कुठलही अस्तित्व मिटवलं जाणार नाही, यासाठी मी जबाबदार असेल.” असंही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी आश्वासन दिलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link