शहर रंगवण्यासाठी ठाणे महापालिका एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या पडले येथील शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बेरंग झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करत तत्काळ पूर्णवेळ शिक्षक नेमण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.
एकेकाळी ठाणे महापालिकेच्या शाळांमधून सुमारे ६० हजारहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर सहा हजारांहून जास्त शिक्षक शिकवत होते. मात्र एकीकडे महापालिकेत भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र या शाळांकडे आणि या शाळांमधील हजारो गरीब विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष झाल्याने गेल्या काही वर्षांत येथील शैक्षणिक दर्जा घसरलाच, शिवाय विद्यार्थ्यांची संख्याही घसरू लागली आहे. सध्या शहरात रंगरंगोटीसाठी १०३ कोटींचा खर्च करण्यात येत आहे, पण शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शाळांच्या दयनीय अवस्थेचे जिवंत उदाहरण ठामपाच्या दिवा-शीळ हद्दीतील पडले गावातील शाळा क्र.९० मध्ये आढळून आले आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे १०५ विद्यार्थी शिकत असून गेल्या तीन महिन्यांत येथे एकही पूर्णवेळ शिक्षक नाही. केवळ एकच शिक्षक येथे कार्यरत असून या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आमदार केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ या शाळेत आवश्यक शिक्षक वर्ग नियुक्त करण्याची तसेच सुविधा पुरवण्याची सूचना केली.