जमीन अधिग्रहण केल्यानंतर नियमाप्रमाणे मोबदला दिला नसल्याचा आरोप सातवी पाडा येथील शेतकरी करत आहेत.
कासा : सूर्या प्रकल्पातील कवडास बंधाऱ्यावरून मीरा-भाईंदर या भागात एमएमआरडीएच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. वेती ग्रामपंचायत हद्दीमधील सातवी पाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही वाहिनी नेण्यात येणार आहे. जमीन अधिग्रहण केल्यानंतर नियमाप्रमाणे मोबदला दिला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करुन हे काम बंद पाडले.
मिरा भाइंदर महानगरपालिकेला पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना शेतकरी आणि एमएमआरडीए कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये वाद होऊ नये यासाठी कासा पोलीस ठाण्याकडून मोठा फौजफाटा पुरविण्यात आला होता. मात्र शेतकरी आपल्या मागणीशी ठाम राहिल्यामुळे चर्चेदरम्यानही काहीही स्पष्ट तोडगा निघाला नाही.
जमीन अधिग्रहण केल्यानंतर नियमाप्रमाणे मोबदला दिला नसल्याचा आरोप सातवी पाडा येथील शेतकरी करत आहेत. जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
एमएमआरडीए कंपनीने आमच्या जागा घेतल्यानंतर आम्हाला नियमाप्रमाणे मिळणारा मोबदला दिला नाही तुटपुंजी रक्कम देऊन आमच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मोजणी केल्यापेक्षा अधिकच्या जागेवर उत्खनन करून आमचे नुकसान केले आहे. जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नाही. – केशव सातवी, शेतकरी