Uddhav Thackeray On Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. अद्याप अनेक मतदारसंघांमध्ये मतमोजणी चालू असली तरी राज्यातील आणि देशातील निकाल स्पष्ट होत आहेत. महाविकास आघाडीला 48 जागांपैकी 29 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपने 28 जागा लढवल्या होत्या. मात्र, भाजपला केवळ 10 जागा जिंकता आल्या आहेत, तर ठाकरे गटाने 23 जागावर निवडणूक लढवली होती अन् त्यांना 10 जागेवर आघाडी घेता आलीये. अशातच आता दमदार कामगिरीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ताकद काय आहे? याचा प्रत्यय आला आहे. एका बोटाची ताकद काय असते? हे सर्वांना कळालंय. इंडिया आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केलाच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी उद्या संध्याकाळी दिल्लीला जाईल. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना भाजपने कमी त्रास दिली नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? असा सवाल जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारला गेला, तेव्हा आम्ही उद्या बैठक बोलवली आहे. आम्ही नक्कीच सरकार स्थापनेचा विचार करू. पंतप्रधानपदाचा चेहरा नक्कीच असेल, यावर देखील चर्चा होईल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी या देखील आमच्यासोबत आहेत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दर्शवला आहे.
अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला नाहीये. निकालात नक्कीच काहीतरी गडबड झालीये, आम्ही नक्की चॅलेंज करू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझ्यावर ज्यांनी विश्वास दाखवला, त्यांचे मी आभार मानतो. मशालने आग लावली आहे पण लढाई अजून बाकी आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.