Mumbai – Goa Vande Bharat Train : मुंबई – गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. कोकण रेल्वेवर मुंबई ते मडगाव आणि मडगाव ते मुंबई अशी वंदे भारत एक्स्प्रेसचा यशस्वी चाचणी अलिकडेच घेण्यात आली. गाडी कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. आता सीएसएमटी ते मडगाव दरम्यान प्रीमियम वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करता येणार आहे. रेल्वे बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 किंवा 16 डब्यांची ही गाडी सुरु होणार आहे. रेकच्या रचनेबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाने सांगितलेला नाही. मात्र, तेजस एक्स्प्रेसच्या तुलनेत या ट्रेनने प्रवासाचा वेळ किमान 45 मिनिटांनी कमी करणे अपेक्षित आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस 5 जूनपासून सुस्साट…
कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस 5 जूनपासून सुस्साट धावणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन सकाळी 5.35 वाजता सुटणार असून ती मडगावला दुपारी 1.25 वाजता पोहोचणार आहे. 5 जूनपासून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार आहे. 3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारतला हिरवा कंदिल दाखवतील. गोव्यातील मडगाव येथे याची तयारी करण्यात येत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास आता कोकण रेल्वे मार्गावर अखेर आता सुरु होणार आहे. ही आठ डब्यांची गाडी उद्घाटनासाठी मडगाव येथे नुकतीच दाखल झाली आहे. गाडीला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर 5 जूनपासून ही वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन सकाळी 5.35 ला सुटेल आणि मडगावला दुपारी 1.25 वाजता पोहोचेल.
कोकण रेल्वे मार्गावर संपूर्ण भारतीय बनावटीची ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याने याची प्रवाशांना मोठी उत्सुकता आहे. गाडीला प्रवाशांच्या मागणी प्रमाणे थांबे देण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगणयात आले आहे की, या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथे थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात दोनच थांबे मिळण्याची शक्यता अधिक आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस असे असणार थांबे
5 जूनपासून ही वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन सकाळी 5.35 ला सुटेल आणि गोव्यातील मडगावला दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. ठाणे सकाळी 6.05, पनवेल 6.40, खेड 8.40, रत्नागिरी 10.00, कणकवली येथे ही गाडी 11.20 मिनिटांनी पोहोचेल. मडगाव दुपारी 1.25 अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35 आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.
तसेच परतीच्या मार्गावर मडगाव येथून सुटल्यावर मुंबईकडे जाताना कणकवली येथे 4.10 मिनिटांनी पोहोचेल. तसेच रायगड जिल्ह्यात रोहा आणि पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री 8.05 वाजता तर पनवेल येथे 9.18 वाजता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.