शहरात भेडसावणाऱ्या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकारी यांना शेकापचे निवेदन
उरण : शहरात भेडसावणाऱ्या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देण्यात आले. उरण शहरात जानेवारी महिन्यापासून मंगळवार व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी रानसई धरणाव्यतिरिक्त हेटवणे किंवा मोरबे धरणांचा अतिरिक्त पाणीसाठा घेऊन उरणकरांची तहान भागवावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरात वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात होत आहे. आनंदनगर ते राजपाल नाका कोटनाका या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते मोकळे होण्यासाठी सुनिश्चित धोरण आखावे. कोटनाका ते कोर्टापर्यंत बायपास रस्ता यामधील अडचणी दूर करून हा रस्ता तयार झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. धुळीवडा येथे पाण्याची नवीन वाहिनी टाकावी, पाण्याची गळती रोखावी तसेच कीटकनाशक फवारणी करावी. पावसाळय़ाआगोदर नालेसफाई करावी इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी शेकाप शहर चिटणीस शेखर पाटील तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, शहर अध्यक्षा नयना पाटील, शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, शहर सहचिटणीस चिंतामण गायकवाड, शहर पदाधिकारी शंकर भोईर, नारायण पाटील, दिलीप पाटील, कोंडस्कर, किशोर घरत उपस्थित होते.