नवी मुंबई पारसिक डोंगराच्या उतारावर अगोदरपासून असलेल्या वृक्षांची छाटणी करून तिथे नवे वृक्षारोपण करण्याचा घाट सध्या नवी मुंबई महानगरपालिकेने घातला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई पारसिक डोंगराच्या उतारावर अगोदरपासून असलेल्या वृक्षांची छाटणी करून तिथे नवे वृक्षारोपण करण्याचा घाट सध्या नवी मुंबई महानगरपालिकेने घातला आहे. त्यातच विकासकांकडून बेसुमार उत्खनन सुरू असल्याने या क्षेत्रात भविष्यात भूस्खलन होण्याची भीती हरितप्रेमी व्यक्त करत आहेत. या भागात पूर्वीपासून असलेले वृक्ष कापून, ते जाळून उतारालगत रांगेत रोपांची लागवड करण्यात आल्याने, या ‘हास्यास्पद स्थिती’कडे पर्यावरणकेंद्री संस्था नॅट कनेक्ट फाऊंडेशनने लक्ष वेधले आहे.
डोंगरउतारावर पालिकेकडून वृक्षारोपण करण्यात आल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेकडून ‘नॅटकनेक्ट’ला स्पष्ट करण्यात आले. ल्यूब्रिझोल लिमिटेडच्या सीएसआर प्रकल्पाद्वारे केवळ सहा हजार झाडे लावण्याची जबाबदारी महापालिकेकडे असल्याचे उपायुक्त जयदीप पवार म्हणाले. या ठिकाणी असलेल्या झाडांची कत्तल करून, त्यांना बेचिराख करून नव्याने करण्यात येणाऱ्या लागवडीमागे नेमके कोणते शहाणपण आहे, असा प्रश्न हरितप्रेमींनी उपस्थित केला. डोंगराचा हा भाग अगोदरच हिरवागार असल्याचे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.पारसिक हिल क्षेत्रात खाणकाम सुरू असलेल्या परिसरात म्हणजे ठाणे-बेलापूर पट्टय़ाच्या दिशेने डोंगराच्या उत्तरेकडील हे वृक्षारोपण होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. झाडांची लागवड मात्र भलतीकडे करण्यात आली आहे.
पारसिक हिल परिसर अतिशय नयनरम्य असून या भागाला कोणत्याही कृत्रिम सौंदर्यीकरणाची आवश्यकता नाही. वृक्षारोपण करण्याकरिता मातीचा उपसा करणे तसेच डोंगर कापून काढल्याने जमीन भुसभुशीत होऊन भूस्खलन होण्याचा धोका नाकारता येणार नाही. – जयंत ठाकूर, अध्यक्ष, पारसिक रेसिडंट्स असोसिएशन
मुख्यमंत्री कार्यालयाकडून वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र डोंगरभागात सुरू असलेल्या उत्खननात कोणताही सरकारी हस्तक्षेप झाला नाही. याविषयी तपास करण्याचे निर्देश ठाण्याच्या प्रमुख वन संरक्षकांना देऊन रेड्डी यांनी आपली भूमिका निभावली. या प्रकरणी शहर विकास विभागाला लक्ष घालण्यास सांगितले आहे.
– बी. एन. कुमार, संचालक,
नॅटकनेक्ट फाऊंडेशन