गेल्या काही महिन्यांपासून परकीय गुंतवणूकदारांकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा सुरू आहे
मुंबई : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसच्या (टीसीएस) १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
यंदा या योजनेच्या तिसऱ्या दिवशी कंपनीच्या २०२० सालातील बायबॅकपेक्षा अधिक प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळाल्याचे दिसून येते. गुंतवणूकदारांना २३ मार्चपर्यंत टीसीएसच्या समभाग पुनर्खरेदी योजनेमध्ये सहभागी होता येईल.
टीसीएसच्या बायबॅक योजनेत सहभागी होण्यासाठी, शुक्रवारी (११ मार्च) दुपारी ३.३५ वाजेपर्यंत २,२३,८७५ गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल केले गेले. यापूर्वी, कंपनीने २०२० मध्ये आणलेल्या बायबॅकमध्ये १,९५,४७० गुंतवणूकदारांनी सर्वाधिक सहभाग घेतला होता. टीसीएसकडून विद्यमान भागधारकांच्या हाती असलेल्या समभागांची प्रत्येकी ४,५०० रुपये किमतीला खरेदी केली जाणार आहे. एकूण सुमारे ४ कोटी समभागांच्या पुनर्खरेदीवर १८,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
टीसीएस बायबॅक योजनेत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या १.५२ कोटी समभागांपैकी तिसऱ्याच दिवशी गुंतवणूकदारांनी ८५ लाख समभाग कंपनीला देऊ करणारे अर्ज केले आहेत. म्युच्युअल फंड घराण्यांकडून ५१ लाख समभाग देऊ केले आहेत. सुमारे १.५ कोटी किरकोळ गुंतवणूकदारांकडे टीसीएसची ३.६ टक्के हिस्सेदारी आहे. तर ४० म्युच्युअल फंड घराण्यांकडे सुमारे ३.३ टक्के हिस्सा आहे. विशेष म्हणजे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून शेअर बायबॅक योजनेला प्रतिसाद अल्प आहे. त्यांनी आतापर्यंत कंपनीच्या केवळ १२ लाख समभागांसाठी अर्ज केला. गेल्या काही महिन्यांपासून परकीय गुंतवणूकदारांकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा सुरू आहे.
कंपनीकडून गेल्या सहा वर्षांत आतापर्यंत तीनदा समभाग पुनर्खरेदी करण्यात आली आहे. लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला आहे. टीसीएसकडे सप्टेंबर २०२१ तिमाहीअखेर ५१,९५० कोटी रुपयांची रोकड गंगाजळी आहे.
आधीच्या पुनर्खरेदी योजना
गेल्या वर्षी १८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान टीसीएसने १६,००० कोटी रुपये मूल्याची बायबॅक योजना राबविली होती. त्यावेळी समभागांची प्रत्येकी ३,००० रुपये किमतीला खरेदी करण्यात आली होती. वर्ष २०१८ मध्ये टीसीएसने १६,००० कोटी रुपये खर्चाची त्या समयी विक्रमी मानली गेलेली बायबॅक योजना जाहीर केली. प्रति समभाग २,१०० रुपये किमतीला भागधारकांकडील समभाग त्यासमयी खरेदी करण्यात आले. त्याआधी २०१७ सालात, प्रति समभाग २,८५० रुपये किमतीला टीसीएसने भागधारकांकडून समभाग खरेदी केले आहेत.
२०२२ १८,००० कोटी रु. ४,५०० रु. प्रति समभाग
२०२० १६,००० कोटी रु. ३,००० रु. प्रति समभाग
२०१८ १६,००० कोटी रु. २,१०० रु. प्रति समभाग
२०१७ १६,००० कोटी रु. २,८५० रु. प्रति समभाग