राज्याचे सरकार हे अजित पवार यांचं नसून उद्धव ठाकरे यांचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे सरकार उद्धव ठाकरेंचं असल्याचं म्हटलं. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आमच्या ज्या मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडणं आमचं काम आहे, असंही नाना पटोले म्हणाले. रत्नागिरी येथे आयोजित ओबीसींच्या हल्लाबोल आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. घोटाळे करण्याची मालिका कोणी सुरू केली असा सवाल करत नाना पटोले यांनी सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर न देता बगल दिली.
भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही, याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटलं असं होत नाही, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे आपला रोख भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे ठेवल्याचे दिसून आलं. किरीट सोमय्या यांनी गावात जाऊन आज पाहणी केली. त्यात यांना मुख्यमंत्र्यांची घर दिसली का, अशा चिमटा देखील काढत नाना पटोले यांनी संजय राऊत यांचं समर्थन केलं. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असं ते म्हणाले.
ठराविक टाईम बॉन्ड मध्ये ही चौकशी झाली पाहिजे, असे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. गृहमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावं, अशी मागणीही पटोले यांनी केली.
The post “राज्यात अजित पवारांचं नव्हे तर उद्धव ठाकरेंचं सरकार” ; नाना पटोलेंचं विधान! appeared first on Loksatta.