ICC T20 Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने (ICC) नुकतीच टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या टी20 मालिकेनंतर दोन्ही संघातील खेळाडूंच्या रँकिगमध्ये यावेळी मोठे बदल पाहायला मिळाले. भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या दमदार फलंदाजीमुळे त्याला या रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला असून विराट-रोहितला मात्र तोटा झाला आहे.
श्रीलंका संघाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरने तीन सलग अर्धशतकं लगावली. सलग आणि आक्रमक पद्धतीने अय्यरने ही अर्धशतकं लगावल्याने त्याला आयसीसी रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला. श्रेयस अय्यरने आयसीसी टी20 आतंरराष्ट्रीय रँकिंगमध्ये 27 क्रमांकाची उडी घेत तो 18 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर कोहली टॉप 10 मधून बाहेर गेला आहे.
विराट कोहलीचं नुकसान
फेब्रुवारीमध्ये झालेल्या टी20 मालिकेत भारताने श्रीलंकेला 3-0 ने मात दिली. 27 वर्षीय श्रेयसने 174च्या स्ट्राइक रेटने तीन सामन्यात नाबाद 204 धावा केल्या. तर श्रीलंकेच्या पाथुम निसांकाने दुसऱ्या सामन्यात 75 धावांची शानदार खेळी केली. पण जगातील अव्वल दर्जाचा फलंदाज विराट कोहली मात्र खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे तो सुमार कामगिरीमुळे 10 क्रमांकावरुन थेट 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.
टॉप-10 मध्ये एक भारतीय
टॉप-10 फलंदाजांचा विचार करता पहिल्या स्थानावर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर एडन मार्करम तिसऱ्या, डेविड मलान चौथ्या तर डेवोन कॉन्वे पाचव्या नंबरवर आहे. भारताचा केवळ एकच फलंदाज या रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये आहे. केएल राहुल 10 व्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha