Shardul Thakur News : भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हा मुंबई मंत्रालयात आला असून शार्दूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शार्दूलचं मुख्यमंत्र्यांना भेटण्यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही, पण तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असून मुख्यमंत्र्यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तो मंत्रालयात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याशिवाय पालघर भागातील क्रिकेट मैदानांची दुरवस्था आणि ग्रामीण भागात क्रिकेटला चालना मिळावी या बाबतही शार्दूल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं समोर येत आहे.
लवकरच लग्नबंधनात अडकणार शार्दूल
नुकताच सलामीवीर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न पार पडलं असून आता शार्दूलही लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचा साखरपुडा मुंबई येथे पार पडला होता. शार्दूल गर्लफ्रेंड मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहे. शार्दूलच्या लग्नाबाबत त्याची जोडीदार अर्थात भावी पत्नी मितालीनेच काही दिवसांपूर्वी दिली होती. मितालीने सांगितले होते की, ‘लग्नाचा सोहळा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात 200-250 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शार्दुल टीम इंडियाच्या शेड्यूलमुळे व्यस्त असल्याने लग्नाची सर्व तयारी मी करत आहे. शार्दुल लग्नाच्या दिवशीच कार्यक्रमाला पोहोचणार आहे.’ पुढे बोलताना मितालीने सांगितले की, ‘लग्नाचे मुख्य कार्यक्रम कर्जतमध्ये होणार आहेत. याआधी आम्ही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं होतं पण लॉजिस्टिक आणि खूप लोकांमुळे सगळ्या व्यवस्थेत खूप अडचणी आल्या असत्या. या कारणामुळे आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.’
कोण आहे शार्दूलची पत्नी?
शार्दुलची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे. तर पालघरचा असणारा शार्दूल आधी आयपीएलमधून सर्वांसमोर आला होता. सुरुवातीला काही संघातून खेळण्यानंतर धोनीच्या कॅप्टन्सीखाली चेन्नई सुपरकिंगमध्ये शार्दूलचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर तिथेही त्याने आपली खास जागा बनवली. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत मिळून ठोकलेलं एक अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं. त्यामुळेच भारत मालिकाही जिंकला होता. त्यानंतर मर्यादीत षटकातही चमकदार कामगिरी करणारा शार्दूल एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात आहे. संघाला विकेटची गरज असताना विकेट घेणारा आणि अ़डचणीच्या काळात फलंदाजी सांभळणारा अशी शार्दूलची ओळख आहे. शार्दूलने तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं आहे. दरम्यान 2021 नोव्हेंबरमध्ये शार्दूलचा साखरपुडा झाला असून त्याचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता.
हे देखील वाचा-