सांताक्रूझ येथील पोद्दार इंटरनॅशनल या शाळेतून सकाळचे सत्र संपवून विद्यार्थ्यांना घरी पोहोचवणारी बस वेळ उलटून गेल्यानंतर तीन ते चार तास न पोहोचल्याने (school bus missing) पालकांसोबत संपूर्ण मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र संध्याकाळच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून घरी पोहोचल्याचे समजल्याने दिलासा मिळाला.
सांताक्रूझ येथील पोद्दार इंटरनॅशनल ही शाळा सोमवापासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. या शाळेचे सकाळचे सत्र संपल्यानंतर काही पालक आपल्या पाल्यांना शाळेत जाऊन घरी घेऊन आले. तर, उर्वरीत सुमारे २५ ते ३० विद्यार्थी बसने आपापल्या घरी जाण्यास निघाले. मात्र बसचा चालक नवीन असल्याने त्याला मुंबईतील रस्त्यांची माहिती नव्हती. परीणामी मुले घरी येण्याची वेळ उलटून सुमारे चार तास होत आले तरी मुले न आल्याने पालकांनी शाळेत धाव घेतली. तेथे विद्यार्थी बसने निघाल्याचे समजले. यानंतर पालकांनी समाजमाध्यमावरून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. चालक आणि महिला मदतनीस नवीन असल्याने रस्ता चुकून ही बस अंधेरीच्या दिशेने गेली. यानंतर चालक बस फिरवून विद्यार्थ्यांना घरी सोडत शाळेत पोहोचला. तेथे पोलिसांनी त्याची चौकशी केली. यानंतर रस्ता माहिती नसल्याने हा सर्व गोंधळ झाल्याची बाब समोर आली.
याबाबत पालकांनी व्यवस्थापनास जाब विचारल्यानंतर मुख्याध्यापकांनी पालकांशी संवाद साधला आणि त्यांचे समाधान झाल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हिना शहा यांनी झाल्या प्रकाराची माफी मागत येत्या काळात चालकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, राजकीय पक्षांनीही या प्रकरणात उडी घेतली. मनसेचे अखिल चित्रे यांच्यासह काही पदाधिकारीही शाळेत पोहोचले आणि त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. तेव्हा विद्यार्थी घरी पोहोचले असून पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे सांगत प्रशासनाने पालकांची लेखी माफी मागितली. तर, आमदार अॅड. आशीष शेलार यांनीही या प्रकारणाची दखल घेतली.
शाळेने उत्तर दाखल करावे
शाळा प्रशासनाने विद्यार्थी सुरक्षेबाबत बससेवेचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. तसे न केल्यामुळे पालकांना मानसिक त्रास झाला आहे. तसेच विद्यार्थी सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत संबंधितांवर तत्काळ कडक कारवाई करावी आणि संपूर्ण घटनेचा अहवाल दुपारी २ वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयात समक्ष सादर करावा, असे पत्र शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी आनंदीलाल अॅण्ड गणेश पोद्दार सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे.