राज ठाकरे निघून गेल्यावरही रस्त्यावरील कार्यकर्त्यांची गर्दी, त्यांची वाहने रस्ता अडवून उभी होती.
दिवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळील मुख्य बाजारपेठेतील एका गृहसंकुलात शनिवारी संध्याकाळी मनसेच्या दिवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संध्याकाळी पाच वाजल्यापासून कार्यालयाच्या बाहेर ढोलपथकांनी मुख्य रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे संध्याकाळी पाच ते आठ असे तीन तास रस्त्यावरील कोंडीने प्रवासी हैराण झाले होते.
रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीतून वाट काढत शीेळ रस्त्याने जाताना दमछाक होत होती. राज ठाकरे येणार म्हणून त्यांच्या छब्या टिपण्यासाठी शेकडो मनसे कार्यकर्ते या गर्दीत मोबाईल कॅमेरे लावून बसले होते. या गर्दीमुळे अनेक रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली. काही रिक्षा चालकांनी प्रवासी वाहतूक करणे शक्य नसल्याने घरचा रस्ता धरला.
दिवा पूर्व रेल्वे स्थानकातून शीळ दिशेेने जाण्यासाठी चंद्रांगण संकुलावरुन पुढे जावे लागते. या संकुलात मनसेचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या सोसायटीच्या आतील भागात अरुंद जागेत उद्घाटन, राज ठाकरे यांची ओवाळणी, सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. अरूंद जागा, त्यात परिसरातील रिहवासी, शेकडो मनसे कार्यकर्ते एकावेळी सोसायटी आवारात एकत्र आल्याने प्रचंड चेंगराचेंगरी येथे झाली. राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असलेले ज्येष्ठ या चेंगराचेंगरीत खाली पडले. दृश्यचित्रीकरण करणाऱ्यांचे मंच रेटारेटीत कोसळले. काहींचे मोबाईल या चेंगराचेंगरीत गेले. भाषणासाठी कार्यकर्ते, रहिवासी उत्सुक होते. चंद्रांगण सोसायटीतील अरुंद जागेत उत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे खासगी वाहन व्यासपीठाच्या एका कोपऱ्याला आणून उभे केले. कोंडीत आणखी भर पडली. महिलांना रेटारेटीला सामोरे जावे लागले.
व्यासपीठावर राज ठाकरे एकीकडे हारतुरे स्वीकारत असताना खासगी कमांडो, पोलीस गर्दीला रेटत होते. माध्यम प्रतिनिधी राज ठाकरे काही बोलणार या तयारीत असताना अचानक राज ठाकरे यांनी वाहनात बसून परतीचा प्रवास सुरू केला. या गर्दीतून त्यांचे वाहन काढताना त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी प्रचंड धक्काबुक्की रहिवासी, कार्यकर्त्यांना केली. मनसेचे स्थानिक नेते, पदाधिकारी हा सगळा रेटारेटीचा प्रकार पाहत होते.
राज ठाकरे निघून गेल्यावरही रस्त्यावरील कार्यकर्त्यांची गर्दी, त्यांची वाहने रस्ता अडवून उभी होती. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकातून शीळकडे जाणाऱ्या रिक्षा चालक, प्रवासी, खासगी बस चालकांना खूप त्रास सहन करावा लागला.
दिवा रेल्वे स्थानकातून अनेक नोकरदार आगासन, शीळ भागाकडे रिक्षेने जातात, त्यांना कोंडीमुळे वेळीच रिक्षा मिळाली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. मनसेने आपले कार्यक्रम अरुंद जागेत घेण्याऐवजी यापुढे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना करण्याची मागणी दिवा गावातील कार्यक्रमाला आलेल्या रहिवाशांकडून केली जात होती.