पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेल्या काही वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या शहरातील २७ तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगणार, की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढी वर्षे ज्या भरतीची वाट पाहिली आणि ज्यासाठी तयारी केली, त्या भरतीच्या अर्जात तृतीयपंथींसाठी रकानाच (कॉलम) ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे या तृतीयपंथींना आता पोलीस भरतीचा अर्ज करता येत नाही. या पार्श्वभूमीवर आता आपल्या हक्काची सरकारी नोकरी मिळविण्यासाठी या लोकांनी न्यायालयीन लढा उभा केला आहे.
तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, कधी सरकारची उदासीनता, तर कधी तृतीयपंथींमध्ये इतरांबद्दल असलेली असुरक्षिततेची भावना यामुळे हे लोक कधीही समाजाच्या मुख्य प्रवाहात आले नाहीत. मात्र, आता शहरातील सुशिक्षित तृतीयपंथींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे ठरविले आहे. यातील अनेक तृतीयपंथी सध्या महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत नोकरी करून सन्मानाचे जीवन जगत आहेत.
यातील २७ तृतीयपंथी सध्या महापालिकेत नोकरी करून पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मैदानी कसरती; तसेच पोलीस भरती अॅकॅडमीमध्ये क्लासही लावले आहे. पहाटे उठूनच हे लोक पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. मात्र, शहर पोलीस दलाच्या निघालेल्या भरतीत अर्ज करताना त्यांना तृतीयपंथी म्हणून रकानाच दिला गेला नसल्याने त्यांना नोकरीसाठी अर्जच करता आला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित मोठ्या पदावरील पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. मात्र, ‘यात तुमच्यासाठी जागा नाही,’ असे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचाही फायदा नाही
पोलीस भरतीचा अर्ज करताना त्यात तृतीयपंथींचा रकाना ठेवण्यात न आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील निकिता मुख्यदल यांनी थेट मंत्रालयात धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा ऐकविली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. ‘तृतीयपंथींसाठी पोलीस भरतीत जागा ठेवा,’ असे ‘मॅट’ने सांगितले; तरीही त्यांच्यासाठी जागा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यदल यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
देशात काही तृतीयपंथी सनदी अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. राज्यातच तृतीयपंथींना असंवेदनशील वागणूक का, आम्ही काय फक्त रस्त्यावर, सिग्नलला भीक मागायची का, मला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. आम्ही एकाच शाळेत शिकलो. एकाच आई-वडिलांनी आम्हाला संस्कार दिले. ते आज नोकरी करतात; मीही त्यांच्याएवढेच शिक्षण घेऊन मला सरकारी नोकरी का नाही? सरकारने आमच्याकडे माणूस म्हणून पाहावे.
– निकिता मुख्यदल, तृतीयपंथी पोलिस भरती उमेदवार
राज्य सराकरने तृतीयपंथींबाबत योग्य धोरण आखावे. त्यांचे अधिकार त्यांना द्यावेत. पोलिस भरतीत तृतीयपंथींना संधी मिळाली नाही, तर मोठा न्यायालयीन लढा उभारू; तसेच वेळप्रसंगी आंदोलनही उभारू.
– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस