शेतकरी वीज प्रश्नांवर कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे
शेतीपंपास दिवसा १० तास वीज देण्याबाबतचा अहवाल येत्या १५ दिवसात तज्ञ समितीकडून घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवरी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिला. तर राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
शेतकरी वीज प्रश्नांवर कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. याप्रश्नी सोमवारी मुंबई येथे उर्जामंत्री राऊत व शेट्टी यांच्यात चर्चा झाली.
राज्य सरकारकडून सध्याची वीजेचे वेळापत्रक व शेतीपंपास दिवसा वीज दिल्यानंतर महावितरणच्या विद्युत वहन क्षमता व आर्थिक भार याबाबतची माहिती दिली. मात्र उर्जामंत्री व अधिका-यांच्या नकारार्थी भूमिकेपुढे बैठकीच्या सुरवातीस संतापलेल्या शेट्टी यांनी विद्युत भाराच्या विभागणीत सरकारला बळी घ्यायला शेतकरीच दिसू लागला आहे का? असा संतप्त सवाल केला. महावितरणला शेतकऱ्यांना शेतीपंपास दिवसा १० तास वीज पुरवठा कसा शक्य आहे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती सादर केली.
दीड तास चाललेल्या बैठकीनंतर उर्जामंत्र्यांनी आंदोलन १५ दिवस थांबविण्याची विनंती केली. पण शेट्टी यांनी याबाबत उद्या प्रमुख पदाधिकारी यांचेसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगून बैठक संपवली. पालकमंत्री सतेज पाटील, महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल, आमदार अरूण लाड, आमदार ऋतुराज पाटील, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक प्रकाश पोपळे, संदीप जगताप आदी उपस्थित होते.