“एखादा कमी शिकलेला आयुक्त कडोंमपात आला तरी चालेल फक्त तो कृतीशील काम करणारा असला पाहिजे”, असंही आमदार पाटील म्हणाले आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना अडीच महिने वेळ मिळत नसेल तर, त्यांनी झेपत नसेल तर येथून निघून जावे आणि सोयीची खुर्ची पकडावी.”, असा सल्ला मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी बुधवारी येथे दिला.
अडीच महिन्यांपासून नागरी प्रश्नांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमदार पाटील आयुक्त सूर्यवंशी यांची भेट मागत आहेत. विविध कारणे देऊन ते भेटत नाहीत. बुधवारी आयुक्तांनी आमदार प्रमोद पाटील यांना भेटीची वेळ दिली होती. परंतु, आमदार पाटील हे पालिकेत दिल्या वेळेत भेटीला आल्यानंतर आयुक्त कार्यालयात नसल्याचे समजले. त्यामुळे आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आमदार पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी यांची भेट घेतली.
“वेळ देऊनही आयुक्त सामान्य नागरिकच काय, लोकप्रतिनिधींनाही भेटत नसतील तर तुम्हाला हवी ती खुर्ची पकडा आणि येथून निघून जा. कशाला आमचे आणि तुमचे हाल करून घेता. या शहराची वाट लावता. अडीच महिने तुम्ही भेट का देत नाहीत, यामागे कोणाचा आयुक्तांवर दबाव आहे का?”, असे प्रश्न आमदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले.
आयुक्त व्यक्ती म्हणून चांगले आहेत. प्रशासकीय कामात ते अग्रेसर आहेत. पण कल्याण-डोंबिवली पालिकेत आता जमत आणि झेपत नसेल तर त्यांनी सरळ मार्ग पकडून एकेरी खुर्ची पकडावी. आपल्या त्यांना शुभेच्छा असतील, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, “एखादा कमी शिकलेला आयुक्त कडोंमपात आला तरी चालेल फक्त तो कृतीशील काम करणारा असला पाहिजे. आयुक्त सूर्यवंशी डोंबिवलीत पाय ठेवत नाहीत. तेथल्या समस्या समजून घेत नाहीत. आमदाराला भेट देत नसतील तर सामान्य रहिवासी, अधिकाऱ्यांची काय अवस्था असेल?, लोकसहभागावर पालिकेचा कारभार चालतो. हे आयुक्तांनी ध्यानात घ्यावे. आम्हाला भेटण्यास वेळ नसेल तर तुमचे येथे काही काम नाही. तुमची आणि आमची तुम्ही सुटका करुन निघून जावे.” अशा कठोर शब्दात आमदार पाटील यांनी आयुक्तांवर हल्लाबोल केला.
रस्ते बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, डोंबिवली पश्चिमेत स्वतंत्र विद्युत उपकर्षण केंद्र या विषयावर पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. पुनवर्सनाचा प्रश्न सोडविला नाही तर आंदोलनाचा इशारा आमदारांनी दिला. या बैठकीला मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, शहराध्यक्ष मनोज घरत, राजन मराठे उपस्थित होते.