वसईत नाल्यावर जलपर्णीचे आच्छादन
वसई: वसई-विरार शहरात सांडपाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले आहेत. मात्र या नाल्यात मोठय़ा प्रमाणात जलपर्णी तयार झाल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे सांडपाणी अडून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव ही अधिक प्रमाणात वाढू लागला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागांतील सोडले जाणारे सांडपाणी हे मुख्य नैसर्गिक नाल्याद्वारे खाडी व समुद्राला मिळते. सध्या स्थितीत शहरातील सांडपाणी वाहून नेणारे नाले हे जागोजागी जलपर्णीने वेढले गेले आहेत. वसई-विरार शहरात दरवर्षी पालिकेकडून नालेसफाई केली जात असते. असे जरी असले तरी जे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात सातत्याने मोठय़ा प्रमाणात जलपर्णीची वाढ होऊ लागली आहे. यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
त्यामुळे आजूबाजूच्या भागात दुर्गंधीयुक्त वातावरण याशिवाय डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नालासोपारा पश्चिम समेळपाडा ते विरार पश्चिम म्हाडापर्यंत जाणाऱ्या नाल्यामध्ये परिसरातील सांडपाणी सोडले जाते, परंतु यामध्ये मोठय़ा प्रमाणात जलपर्णी वाढल्याने नाल्यातील सांडपाणी वाहणे बंद होऊन डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला असल्याने भाजपचे मनोज पाटील यांनी सांगितले आहे. परंतु पालिकेने ही जलपर्णी काढून टाकण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने दिवसेंदिवस अधिक समस्या जटिल बनू लागली आहे.
सांडपाण्यावर जनावरांच्या चाऱ्यांची उगवण
नाल्याच्या बाजूस असलेल्या शासकीय व खासगी जमिनीवर सांडपाणी सोडून गवत पैदास केली जाते त्यामुळे मोठय़ा प्रमाणात मच्छर तयार होऊन त्याचा भयंकर त्रास पश्चिम भागात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. तसेच हे गवत वसई-विरारमधील तबेल्यात जनावरांना दिले जाते जे आरोग्यास अत्यंत घातक आहे. यासंबधी आज सहकारी व जागरूक नागरिकांसोबत जागेवर पाहणी करून महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने स्वच्छता तसेच गवत उगवणारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
The post जलपर्णीमुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे appeared first on Loksatta.