२१ वर्षीय नवीनचे वडील शेखरप्पा ज्ञानगौदार यांनी सांगितले की, माझ्या मुलाला पीयूसीमध्ये ९७ टक्के गुण मिळाले होते, तरीही त्याला राज्यात मेडिकलमध्ये जागा मिळू शकली नाही. भारतातील गुणवंत मुलांना देशात वैद्यकीय जागा मिळवण्यासाठी करोडो रुपये मोजावे लागत असल्याने त्यांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते असेही ते म्हणाले. नवीनच्या वडिलांच्या विधानातून वेदनांसोबत त्यांचे दडपणही दिसत होते. भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील शुल्क वाढीमुळे अशा अनेक पालकांना आपल्या पाल्यांना परदेशात पाठवावे लागते.
भारतात प्रवेश मिळणे खूप अवघड
प्रत्यक्षात भारतात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे खूप अवघड असल्याचे अनेक पालकांचे मत आहे. देशात उपलब्ध असलेल्या एमबीबीएसच्या जागांच्या संख्येवरून याचा अंदाज बांधता येतो. सध्या भारतात एमबीबीएसच्या साधारण ८३ हजार जागा आहेत. आणि यासाठी २०२१ च्या नीट परीक्षेत १६ लाख मुलांनी नोंदणी केली होती. म्हणजेच प्रत्येक जागेसाठी १९ मुले एकमेकांशी स्पर्धा करत होती.
तर दुसरीकडे युक्रेन आणि रशियासारख्या देशांमध्ये प्रवेश मिळवणे खूप सोपे आहे. उदाहरणार्थ, नीट उत्तीर्ण असेल तर परदेशात लगेच प्रवेश मिळतो. पण भारतात जागा कमी आणि कट ऑफ मार्क्स खूप जास्त आहेत. त्यामुळे नीट पास केल्यानंतरही प्रवेश मिळेलच याची खात्री नसते.
शुल्कातील फरक
भारतात एकूण ५४९ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. भारतातील एकूण ८३ हजार जागांपैकी साधारण ३८,८०० जागा खासगी महाविद्यालयांमध्ये आहेत. जिथे किमान ६० ते ७० लाख रुपये खर्च फक्त फीवर होतो. तर सरकारी महाविद्यालयांमध्ये साधारण ४२,७०० जागा आहेत. जिथे अभ्यासाचा खर्च ८ ते १० लाख रुपये येतो. पण तिथेही दुहेरी स्पर्धा असते. दुसरीकडे युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी २० ते २५ लाख रुपये इतका खर्च होतो.
भारतात डॉक्टरांची संख्या कमी
विकसित देशांशी तुलना केल्यास, भारतात दर १०० लोकसंख्येमागे डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. २०१९ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतात दर १००० लोकसंख्येमागे ०.९२८ डॉक्टर आहेत. फ्रान्समध्ये ६.५, यूकेमध्ये ५.८, यूएसएमध्ये २.६ डॉक्टर आहेत. जेणेकरून १३० कोटी लोकसंख्या असलेल्या नागरीकांच्या आरोग्याच्या गरजा भागाव्यात यासाठी भारताला अधिकाधिक डॉक्टरांची गरज आहे.