देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांचे मत
पुणे : करोना काळात सर्वसामान्य नागरिकांना विदाचे (डेटा) महत्त्व कळले. रुग्णसंख्या, वाढणारी रुग्णसंख्या, लाटांचे अनुमान या विषयी नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली. विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित झाल्याचे मत, देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांनी शुक्रवारी मांडले.
गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेतील लोकसंख्या संशोधन केंद्र, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाच्या महासंचालक संध्या कृष्णमूर्ती आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. श्रीवास्तव म्हणाले, की लोकसंख्या संशोधन केंद्रांची भूमिका आता बदलत आहे. देशभरात विखुरलेल्या लोकसंख्या संशोधन केंद्रांद्वारे प्रादेशिक ज्ञान, माहिती येते. या केंद्रांचे असलेले प्रश्न मंत्रालयाकडून सोडवले जाण्याची गरज आहे. केंद्रांनी लोकसंख्येच्या विदाचा अभ्यास करून त्याचे परिणामही सांगितले पाहिजेत, तंत्रज्ञानाचा वापर करून धोरणकर्त्यांना महत्त्व पटवून दिले पाहिजे. ही केंद्रे स्वत:च्या पायावर उभे राहण्याची आवश्यकता आहे. तेलाइतके विदाचे महत्त्व असल्याचे म्हटले जाते. मात्र तंत्रज्ञान, साधने आणि मनुष्यबळासंदर्भात संख्याशास्त्रज्ञांचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळेच विदामध्ये अधिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे.
गोखले संस्थेने लोकसंख्याशास्त्रीय संशोधन अनेक वर्षे केले आहे. लोकसंख्याशास्त्राशी संबंधित संशोधन अतिशय महत्त्वाचे असल्याने संस्थेने अनेक सर्वेक्षणे, संशोधन प्रकल्प राबवले आहेत, पुस्तके प्रकाशित केली आहेत, असे डॉ. रानडे यांनी नमूद केले.
लोकसंख्या संशोधन केंद्रांचे आता इन्क्युबेशन केंद्रात रूपांतर
लोकसंख्या संशोधन केंद्रांमध्ये संशोधनासह प्रयोगांची आवश्यकता आहे. त्यामुळेच या केंद्रांचे आता इन्क्युबेशन केंद्रात रूपांतर करण्यात येईल. लोकसंख्येचा अभ्यास देशासाठी, राज्यासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय लोकसंख्या संशोधन संस्थेच्या (आयआयपीएस) माध्यमातून क्षमतावृद्धीचे कार्यक्रम राबवले जातील. तंत्रज्ञानाच्या माध्यमातन अभ्यासाची व्यापकता वाढवली पाहिजे. केंद्रांनी राज्यांसह काम करून संशोधन करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा उपयोग धोरण निर्मितीसाठी होईल, असे डॉ. कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये लोकसंख्या दर्शक घडय़ाळ बसवण्यात आले आहे. या डिजिटल घडय़ाळाचे उद्घाटन देशाचे माजी मुख्य सांख्यिकी डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाच्या महासंचालक संध्या कृष्णमूर्ती, लोकसंख्या संशोधन केंद्राच्या डॉ. विनी सिवानंदन आदी या वेळी उपस्थित होते.
The post विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित appeared first on Loksatta.