उडुपी येथील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाब परिधान करण्यावरून या वादाला सुरूवात झाली. या वादाला पुढे हिजाब विरुद्ध भगवी शाल, फेटे असा रंग चढला. नंतर या वादाचे संपूर्ण राज्यभर आणि पुढे देशपातळीवर पडसाद उमटले. कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या एका गटाने त्यांच्या वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची मागणी केली. त्यादरम्यान काही हिंदू विद्यार्थिनी भगवे फेटे, भगवी शाल परिधान करून आल्या. यानंतर याचिकाकर्त्या विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केल्या.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती जे. एम. काझी यांच्या पूर्ण खंडपीठाने हिजाब बंदी मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नसल्याचे सांगत या याचिका फेटाळून लावल्या.
दरम्यान, या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण आठवडाभर म्हणजेच १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान बेंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलने, निदर्शने आणि उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे.