‘आम्ही झोपेत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास आगीला सुरुवात झाली. ती कुठून व कशी सुरू झाली याची आम्हाला काहीच कल्पना नाही.
ईशान्य दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन मुलांसह ७ जण मरण पावले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगीतील जीवहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
१३ वर्षांचा रोशन व त्याची ९ वर्षांची बहीण दीपिका अशी एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुले आगीत जळाली. मृतांपैकी अतर ५ जण दुसऱ्या कुटुंबातील होते. त्यांची नावे बबलू (३२), रणजित (२५), रेश्मा (१८), प्रियंका (२०) व शहंशाह (१०) अशी आहेत.
‘आम्ही झोपेत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास आगीला सुरुवात झाली. ती कुठून व कशी सुरू झाली याची आम्हाला काहीच कल्पना नाही. आमची एकच खोली आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी आम्ही झोपडीबाहेर पडलो’, असे रोशन व दीपिका यांचे ५८ वर्षांचे आजोबा संतू यांनी सांगितले.
अग्निशामक दलाचे १३ बंब घटनास्थळी रवाना झाले आणि पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आली. सुमारे ६० झोपडय़ांना आगीची झळ पोहचली व त्यापैकी ३० झोपडय़ा आगीत पूर्णपणे जळाल्या. आगीने बेचिराख झालेले ७ मृतदेह आगीच्या ठिकाणी सापडले, असे दिल्ली अग्निशामक दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी प्रौढ मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, अल्पवयीन मृतांसाठी ५ लाख रुपये आणि ज्यांच्या झोपडय़ा जळाल्या त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.